पश्चिम महाराष्ट्र

कर्मवीर व सौ.लक्ष्मी वहिनी यांचा प्रवास परंपरेकडून आधुनिकतेकडे- डॉ. प्रकाश पवार

रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन

सातारा : जागतिक  दृष्टिकोनातून विचार करता अण्णा व वहिनी ही परंपरेकडून आधुनिकतेकडे प्रवास करणारी व्यक्तिमत्वे आहेत. रयत माऊली या आधुनिकतेच्या जवळ गेलेल्या आहेत. त्यांनी विषमता नाकारून समता स्वीकारली. कौटुंबिक हिंसाचार थांबवून सुखी कुटुंब व्हावे यासाठी योगदान दिले. आधुनिकतेचे वैशिष्ट्य हे की जबाबदारी घेऊन काम करणे, हेच काम कर्मवीर परगावी गेल्यावर त्या करीत असत.

1930 च्या कामेरीच्या जंगल सत्याग्रहात जाऊ नका, सर्व जाती धर्माची मुलं तुम्ही आणली आहेत. त्यांच्या शिक्षणाचे काय ? असे म्हणून जबाबदारीची जाणीव लक्ष्मीवहिनी यांनी अण्णांना करून दिली होती. अनेक मुलांची काळजी रयत माऊली यांनी घेतली आहे. अण्णा देणगी गोळा करण्यासाठी बाहेर जात अशा वेळेस सर्व वसतिगृहाची जबाबदारी लक्ष्मीवहिनी घेत असत. स्वावलंबनाचे तत्व हे लक्ष्मीवहिनी यांनी स्वीकारलेले होते. जॉन ड्युई यांनी शिक्षणातील विविध प्रयोग केले. त्या प्रकारचे प्रयोग साताऱ्यामध्ये वसतिगृहामध्ये कर्मवीर व सौ. लक्ष्मीवहिनी यांनी अगोदरच सुरू केलेले दिसून येते.

निसर्गाशी संवादी राहण्याचे व संवेदनशीलतेचे शिक्षण जॉन ड्युई यांनी महत्वाचे मानले होते. तेच शिक्षण तर कर्मवीर आणि वहिनींच्या रयत शिक्षण संस्थेत मिळत होते. आज जॉन ड्युई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याचा तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा’ असे मत शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी वहिनी यांच्या 93 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. रयत शिक्षण संस्थेने शाहू बोर्डिंग येथे रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील हे उपस्थित होते. यावेळी कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी प्राचार्य आर.डी.गायकवाड. ॲड. दिलावर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्मवीर व सौ.लक्ष्मी वहिनी यांच्या आपलेपणाच्या स्वावलंबी शिक्षणाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की,‘कलेक्टर डॉ. हमीद अली यांना कर्मवीरांनी चार भिंतीचा डोंगर मागितला. त्यावेळी डॉ. हमीद अली यांनाही आश्चर्य वाटले, पण पुढे अण्णांनी स्वतःच्या हिंमतीवर व विद्यार्थ्यांच्या मदतीने श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जपत या भूमीवर डोंगराला लागून इमारती उभ्या केल्या.

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी ही अण्णांची प्रेरणास्थाने होती. म्हणूनच या महापुरुषांची प्रेरणा कायम राहावी म्हणून त्यांनी साताऱ्यामध्ये त्यांच्या नावाने ज्ञानमंदिरे उभे केली. अण्णांची दृष्टी आधुनिक व विशाल होती. परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई यांनी घातला. वहिनींनी त्यांना उत्तम साथ दिली. म्हणूनच रयतचा आज वटवृक्ष झाला. अण्णा आणि वहिनींच्या शिक्षण पद्धतीत कृत्रिमपणा अजिबात नव्हता. फक्त नैसर्गिकता हा भाव चिरंतन वाटतो आणि तोच अण्णा व वहिनी यांच्या शिक्षणातून दिसून येतो. शिक्षण म्हणजे केवळ बोलणे नाही, स्वातंत्र्य, समता, सहजीवन, प्रेरणा, बंधुभाव हा मूल्यविचार त्यांच्या शिक्षण विचारात दिसतो ’असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले की, आपल्या स्वतःच्या मुलांना जे शिक्षण मिळावे असे आपल्याला वाटते, तेच शिक्षण सर्वसामान्य मुलांना विशेषत: ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलांना मिळावे. यासाठी रयत शिक्षण संस्था गुणवत्तेच्या बाबतीत अजिबात तडजोड करणार नाही. कर्मवीर विद्यापीठ उभे राहिले, भविष्यात अजून दुसरे विद्यापीठ निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची मराठी माध्यमांची शाळा उभी राहील अशी माहिती या निमित्ताने त्यांनी दिली. सौ. लक्ष्मीवहिनी यांचे योगदान अण्णांपेक्षा कितीतरी मोठे आहे. रयतवर अण्णांपेक्षा वहिनींचे ऋण अधिक राहिले. वहिनी व अण्णा यांचा वारसा जर जपायचा असेल तर त्याग समर्पणाची भावना यांची जपवणूक करावीच लागेल, असे मत डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

संस्थेचे सचिव प्रा. डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविकात‘लक्ष्मीवहिनी यांनी स्वतःची मुलं व वसतिगृहातील सर्व जातीधर्माची मुले यांच्यात कुठलाही भेदभाव न मानता सर्व जाती-धर्माच्या मुलांची जातीने सेवा केली. वहिनींच्या अंत:करणाला, त्यांच्या थोरवीला शब्द नाहीत. त्यागाने ओसंडून वाहत असलेला त्यांचा इतिहास आहे. त्यांच्या त्यागमय जीवनातून रयतच्या विशाल वटवृक्षाला सतत जीवनरस मिळेल. त्या भारतातील थोर मातांपैकी एक थोर माता आहेत असे मत व्यक्त केले.

प्रारंभी प्रा.संभाजी पाटील व सहकारी यांनी कर्मवीर, रयतमाऊली व रयत शिक्षण संस्था यांचा गौरव करणारी व कृतज्ञता व्यक्त करणारी गीते सादर केली. वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत गुजरे यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी रा.ब.काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा येथील पालक, विद्यार्थी व सेवकांनी स्नेहसंमेलनात 42 हजार 870 रुपये खर्च बचत करून अनाथ व आर्थिक दुर्बल वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना सौ. लक्ष्मीवहिनी यांच्या नावे फंड सुरू करून देणगी दिली. हा नवा आदर्श सर्वांना घालून दिल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापक अमोल कोळेकर, पालक प्रतिनिधी सौ.कल्याणी कारखानीस व सेवकांचा यानिमित्ताने यावेळी सत्कार करण्यात आला. देणगीदार साहेबराव घाडगे गुरुजी यांनी वसतिगृहास सतत देणगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.

याप्रसंगी माध्यमिक विभागाचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, प्रा. संभाजी पाटील, प्रा. डॉ. भारत जाधव, ओ. एस. डी. व संस्थेचे समन्वयक प्राचार्य शहाजी डोंगरे, देणगीदार, जनरल बॉडी सदस्य, लाइफ वर्कर, लाइफ मेंबर व साताऱ्यातील सर्व रयतच्या शाखांतील रयत सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button