अहमदनगर

युवकांना उद्योजकीय मानसिकतेची गरज – आलोक मिश्रा

राहुरी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी व अर्थशास्त्र विभागांतर्गत आज महाविद्यालयात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहमदनगर (M.C.E.D) यांच्याशी राहुरी महाविद्यालय व अर्थशास्त्र विभागाअंतर्गत “सामंजस्य करार” (एम.वो.यू.) करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र नाशिक चे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा “विविध व्यवसायातील रोजगाराच्या संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना म्हणाले, स्पर्धेच्या युगात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकीय मानसिकतेची कास धरली पाहिजे. देशाच्या आर्थिक विकासाचा उद्योग हा एक महत्व पूर्ण दुवा आहे. युवकांनी स्वतःतील कौशल्य ओळखून व्यवसाय व उद्योगामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. कमीत कमी भांडवलात उद्योग व्यवसाय सुरू करता येतात, फक्त इच्छाशक्तीची त्याला जोड हवी.

यावेळी त्यांनी मिठाई, मेणबत्ती, वात, पार्लर, मोबाईल दुरुस्ती, अगरबत्ती, मसाले, साबण, मेहंदी, बटाटा चिप्स, वेफर्स, आवळा कॅण्डी, याबरोबरच कृषिशी निगडित दुग्ध प्रक्रिया उद्योग, गाईपालन, वराह पालन, मत्स्य पालन या व इतर व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन हे व्यवसाय सुरू करायला हवेत अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले प्रत्येक युवकांनी आपल्यात उद्योजकीय गुण विकिसित केले पाहिजे. यासाठी स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, नेतृत्वगुण, चिकाटी, मेहनत करण्याची वृत्ती, क्षमता हे गुण विकसित करायला हवेत.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहमदनगर चे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवडे, राहुरीचे समतादूत एजाज पिरजादे, प्राचार्य डॉ. अनिता वेताळ, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विद्या थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. तात्यासाहेब जीवडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले, आपल्याशी होणारा हा सामंजस्य करार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक शासकीय योजनांची माहिती व व्यवसाया बद्दलची माहिती प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देणार आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वेताळ आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या या सामंजस्य करारातून आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे अधिक ज्ञान मिळून रोजगार निर्मितीसाठीचे उपयुक्त प्रशिक्षण मिळणार आहे.

प्रा विद्या थोरात प्रास्ताविक करताना म्हणाल्या अर्थशास्त्र विभागाचा हा पहिलाच सामंजस्य करार असून ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुणांना या कराराचा अधिकाधिक लाभ होईल. व्यावसायिक मार्गदर्शन व प्रशिक्षण युवकांच्या विभिन्न कौशल्यात भर टाकून त्यांना रोजगार मिळवून देण्यास व उद्योग सुरू करण्यास मदत करील. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. डॉ. संदीप इरोळे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रा. अंकुश कोबरणे, प्रा. वैशाली कुलकर्णी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी दीपक पराये, अधीक्षक अंबादास पारखे, भाऊसाहेब कोहकडे व प्रा. गीताराम चोथे यांनी विशेष सहकार्य केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button