राजकीय

मित्र पक्षांनी विचारात न घेतल्यास शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार – देवेंद्र लांबे

राहुरी – तालुक्यात होणाऱ्या आगामी निवडणुका खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असून शिवसेना पक्षाचे मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांनी शिवसैनिकांना विचारात न घेतल्यास शिवसेना पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी सक्षम आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुका लढविणार आहे. या निवडणुका लढविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, अशा सूचना शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिल्या आहेत.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे रविवार दि.९ रोजी शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवदूतांची बैठक शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, उपाध्यक्ष प्रशांत खळेकर, संघटक महेंद्र उगले, शेतकरी सेना प्रमुख किशोर मोरे, महिला आघाडी अध्यक्ष सौ.वनिताताई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस मार्गदर्शन करतांना देवेंद्र लांबे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे कृतिशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व शिर्डी लोकसभेचे पाणीदार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी व शासनाने राबविलेल्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात टाकळीमिया येथे करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे शासन स्तरावर कामे अडकली असतील तर शिवदुतांनी स्वतः लक्ष घालून कामे शासकीय कार्यालयातून मार्गी लावून द्यावीत. शासनाने १ रूपयात पीक विमा उतरविण्याचे आदेश दिलेले आहेत. पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांकडून सेतू चालक पैशाची मागणी करत असल्यास तहसिलदार यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रत्येक मतदान केंद्राचे बूथ प्रमुख नेमण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रू. पाच लाख मध्ये सर्व उपचार केले जाणार आहेत, या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे याची जनजागृती करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. राहुरी तालुक्यातील ३२ गावे श्रीरामपूर मतदार संघात येत असून खा. सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीतून भरघोस निधी देण्यात आलेला आहे. खा.लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे ३२ गावांत विकासाचा आलेख उंचावला आहे. यावेळी अशोक शेळके, बाळासाहेब जाधव, वनिताताई जाधव, संदीप गल्हे, बापूसाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी ३२ गाव शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे, देवळाली प्रवरा शिवदूत प्रमुख वसंत कदम, सतिष चोथे, रोहित नालकर, अरुण जाधव, नवे काचोळे, भागवत करपे, रमेश म्हसे, ज्ञानेश्वर सप्रे, दिनकर मोरे, दादासाहेब शिंदे, कल्पना धनवटे, बाळासाहेब कदम, दत्तात्रय कणसे, संगीता गायकवाड, गणेश विटनोर, मंदा साळवे, राणी साळवे, गयाबाई करपे, दत्तात्रय आढाव, प्रभाकर तुपे, रमेश सोनवणे, कमल घोरपडे, स्वाती करपे, नारायण शेटे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र शेळके यांनी केले तर आभार प्रणय पटारे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button