पश्चिम महाराष्ट्र
संविधानामुळे आपल्या जीवनात परिवर्तन व बदल : परवीन शेख
श्रीरामपूर [प्रतिनिधी] : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली व भारतीय संविधान मोठ्या कष्टाने सर्व देशांचा अभ्यास करून तयार केले. ते आपल्या जीवनात परिवर्तन व बदल घडविणारे आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा न्यायालय विधिज्ञ परवीन शेख यांनी भूमी फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या झूम मिटिंग मध्ये केले.
दि २६ नोव्हेंबर रोजी जागतिक संविधान दिन असल्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन देशात साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे समाजात संविधान बाबत जनजागृती व्हावी म्हणून भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने झूम मिटिंग व्दारे सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्तविक संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी केले व विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख अतिथी पुणे जिल्हा न्यायालय विधिज्ञ परवीन शेख यांचे”माझे संविधान माझा अभिमान”या उपक्रमावर मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या लोकसंवाद हा महत्वाचा आहे. संविधानंमुळे स्त्री पुरुष समानता अधिकार मिळाला. असे अनेक फायदे लाभले. संविधान नसते तर लोकशाही ऐवजी हुकुमशाही झाली असती. संविधान हा कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया नसतो. असंख्य भाषा जाती पंथ धर्म असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वाना जोडणारे असे भारतीय संविधान आहे.
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे असे भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्राचार्य टी इ शेळके यांनी शहराप्रमाणे संविधानाची जनजागृती खेड्यापाड्यांपर्यन सर्वाना करणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामीण साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये यांनी कविता सादर केली. खंडाळा वैजापूर ग्रा.प. सदस्य दिनकर मगर यांनी मनोगत व्यक्त केले.
या ऑनलाईन कार्यक्रमात प्राचार्य व मार्गदर्शक टी इ शेळके, डॉ बाबुराव उपाध्ये, पत्रकार बी आर चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, प्रशांत बोबडे, राज्य शिक्षण सल्लागार भाऊसाहेब कुरकुटे, गोजिरी बढे, सुरेश भोसले, रामा पवार, दिनकर मगर, प्रवीण क्षीरसागर आदी मान्यवर सहभागी झाले होते. आभार प्रदर्शन पत्रकार बी आर चेडे यांनी केले.