मृत्यू अटळ आहे, माणसानं मृत्यूला कधी विसरू नये – हभप रासवे महाराज
◾उपसरपंच कडुबाळ सुसे यांचा स्तुत्य उपक्रम
विलास लाटे/पैठण : ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूला जो विसरला त्याचा पाय घसरला. जो माणूस रात्रंदिवस मृत्यूचं स्मरण ठेवतो तो माणूस जीवनात कधीच चुकीचं वागत नाही. मात्र जो व्यक्ती मृत्यूला विसरला त्याचाकडून अनाचार घडल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे मृत्यूचं माणसाला स्मरण असलं पाहिजे. म्हणून माणसानं कधी मृत्यूला विसरू नये, मृत्यू अटळ आहे असे प्रतिपादन हभप कृष्णा महाराज रासवे यांनी केले.
पैठण तालुक्यातील टाकळी येथील उपसरपंच कडुबाळ सुसे यांच्या आई स्व.सरस्वती नामदेव सुसे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त शुक्रवार,२९ रोजी रक्तदान शिबिर व किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.सभापती विलास भुमरे, जि.प.सदस्य साईनाथ सोलाट, संचालक विजय गोरे, कारभारी भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पुर्वजांप्रती कृतज्ञता म्हणून काहीतरी सत्कर्म केले पाहिजे. आई-वडिलांना सांभाळा, भगवंताचे नामस्मरण करा यातच जीवनाचे सार्थक आहे. असा मौलिक उपदेशही त्यांनी देत स्वतः रक्तदान ही केले.
उपसरपंच सुसे यांना आईच्या आजारपणात रक्ताची खरी किंमत कळाली, हि बाब लक्षात घेऊन आईच्या तेराव्या निमित्त रक्तदान शिबिर घेऊन समाजापुढे एक नवा पायंडा त्यांनी पाडला होता. तोच वारसा जपत व सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. याची जाणीव ठेवून वर्षश्राद्ध दिना निमित्तही रक्तदान शिबिर राबविले. या शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. यासाठी औरंगाबाद ब्लड बँक रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आप्पासाहेब ठोंबरे, सिताराम सोलाटे, व्हा.चेअरमन भानुदास लाटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जामदार, अशोक लाटे, अनिकेत जोशी, बबन लाटे, रघूनाथ जाधव, सुरेश जाधव, कडुबाळ जाधव, आप्पासाहेब जाधव, नारायण काळे, शरद सुसे, बालचंद सुसे, अशोक सुसे, दिंगबर घावट, दत्ता घावट, योगेश मोहीते, सुभान शेख, रविंद्र लाटे, शरद बोबडे, याशिन शेख, सचिन राठोड, विष्णु वाघ, गोपाळ सोनवणे, संदीप वाघ, आकाश गवळी, गणेश सोलाटे, सुनील गवळी, गवांदे, ज्ञानेश्वर एखंडे, अजय नरवडे, योगेश अवधूत आदींची उपस्थिती होती.