साहित्य व संस्कृती
डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या “फिरत्या चाकावरती ” आत्मकथनामुळे आश्चर्यचकित झालो : मुख्याध्यापक वाळुंजकर
श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : माणसाला वाचनातून जगाचं लपलेलं सत्य गवसते,वाचन ही समाधान आणि आत्मभान देणारी संस्कृती आहे, हे मला डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या लेखनातून कळले, त्यांनी लिहिलेले “फिरत्या चाकावरती “आत्मकथन “म्हणजे जीवनातील एक आश्चर्य असल्याचे मत वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ईश्वर वाळुंजकर यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ईश्वर वाळुंजकर यांच्या आदर्श सेवाकार्याबद्दल आणि वाचन संस्कृती जपल्याबद्दल सन्मान करण्यात आला,याप्रसंगी “फिरत्या चाकावरती “आत्मकथन स्वतः आणि परिवाराने वाचल्यानंतरचे अनुभव सांगताना मुख्याध्यापक वाळुंजकर बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मुख्याध्यापक म्हणून ईश्वर वाळुंजकर यांनी सर्वांना बरोबर घेऊन श्री छत्रपती शिवाजी विद्यालयासाठी केलेले प्रामाणिक कार्य, रयतनिष्ठ जाणीव ठेऊन विद्यार्थीहित आणि ग्रामस्थप्रेम संपादन केले.अनेक पुस्तके वाचून, विद्यार्थ्यांना वाचन गोडी कशी लावली याबद्दल कौतुक केले.माणूस किती काळ भेटला यापेक्षा त्यांनी कोणता आदर्श निर्माण केला हेच संचित लोकमनात उरते, प्रेरणादायी ठरते असे आदर्श मुख्याध्यापक म्हणून ईश्वर वाळुंजकर यांच्या कार्याला देणग्या मिळाल्या आणि त्यांनी शाळेत सुधारणा केल्याच्या आठवणी डॉ. उपाध्ये यांनी सांगितल्या. प्रथमेश वाळुंजकर यांच्या वाचन आणि शिक्षण प्रगतीबद्दल सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सन्मान केला.मुख्याध्यापक ईश्वर वाळुंजकर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले,2020 सालात शाळेत काम करताना समाधान वाटले. वडाळा महादेव हे शिक्षणप्रेमी गाव आहे,अनेकांच्या योगदानातून शाळेचा विकास होत आहे,आदरणीय मीनाताई जगधने, प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे शालेय कमिटीचे आणि शिक्षकांचे खूप सहकार्य लाभल्याबद्दल मुख्याध्यापक वाळुंजकर यांनी समाधान व्यक्त करून अनेकांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आठवणी सांगितल्या. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 40पुस्तके लिहिली त्यापैकी कितीतरी पुस्तके मी वाचली. त्यांच्या लेखनात जीवनसंघर्ष आहे. त्यांना त्यांचा मूळ गावशिव आठवत नाही, वडील माहीत नाहीत, आई त्यांना त्यांच्या 7-8वर्षापर्यंतच लाभली, त्यांना शिक्षण घेणे आणि जगणे कठीण होते, अशा असह्य, निराधार जीवनात त्यांनी शिक्षणाचा दिवा हाती धरला, कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ चा त्यांना आधार मिळाला प्राध्यापकआणि मित्रांनी त्यांना सहकार्य केले शिक्षण घेऊन त्यांनी 33वर्ष रयतमध्ये प्रामाणिकपणे नोकरी केली. त्यांनी कृतज्ञता जपत बोरावके कॉलेजच्या गेटसाठी 02लाख 51हजाराची देणगी दिली.ज्या वडाळा महादेव शाळेत वसतिगृहात राहून त्यांनी 1972-73ला शिक्षण घेतले त्या जाणिवेतून शाळेला 25हजाराची देणगी दिली. शेकडो पुस्तके मोफत दिलीत, त्यांचे आत्मचरित्र वाचून आमच्या घरातील आणि गावातील लोक रडले, अंतर्मुख झाले.त्यामुळेच त्यांचे “फिरत्या चाकावरती “आत्मकथन जीवनाचे आश्यर्यकारक लेखन असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रथमेश वाळुंजकर यांनी डॉ. उपाध्ये यांच्या पुस्तकामुळे आम्हाला वाचनाची गोडी कशी निर्माण झाली याविषयी मत व्यक्त केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.