महाराष्ट्र

विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 37 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

राहुरी | जावेद शेख : कृषि हा आपल्या देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. तुम्ही कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकर्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा. सन 2047 चा विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठे व या विद्यापीठातून पदवी घेतलेले तुम्ही कृषिचे पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार कराल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 37 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर.एस. परोदा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषचेदे महासंचालक रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.

राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वाचून दाखवला. त्यांच्या संदेशात कृषि मंत्री म्हणाले कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सध्या कृषि क्षेत्र हे बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जातांना शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी मानद डॉक्टर पदवी मिळालेल्या ना. राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले, विलास शिंदे व पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रमुख पाहुणे डॉ. आर.एस. परोदा आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की तुम्ही नवनविन ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा जेणेकरुन तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. सन 2030 सालापर्यंत आपल्या देशात एकही गरीब नसणे व कोणीही उपाशी राहणार नाही हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा र्हास थांबविणे, सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे ही आपल्या समोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नविन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे. जी.एम. पिके, सेंसर्स आधारीत उपकरणे, बाजारपेठांची निर्मिती त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसहाय्यता गट या बाबी आपल्याला योग्य दिशेने नेण्यास मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले की विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्यांना उपयोगी ठरणार्या 1774 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 295 वाणांची निर्मिती व 46 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. भविष्यातील शेती ही डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. विद्यापीठ आपल्या संशोधनामध्ये ड्रोन, आय.ओ.टी. व सेंसर्सवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत असून यातील संशोधनामुळे शेतकर्यांना शेती करणे सुलभ होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते ना. राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले व विलास शिंदे यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत केले. यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. तसेच यावेळी 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6,522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6,895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2022-23 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी कृषिदर्शनी-2024, पौष्टिक तृणधान्य माहिती पुस्तीका, मफुकृवि आयडॉल्स व मफुकृवि दिनदर्शिका प्रकाशनांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले. समारंभाला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button