ठळक बातम्या

कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरू ठेवल्याने आंदोलन स्थगित – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी – मुळा उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने सुरळीत सुरू ठेवल्याने उद्या होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज राहुरी येथे उद्या होणाऱ्या आंदोलनाबाबत नायब तहसीलदार सौ. पुनम दंडीले यांच्या उपस्थितीत आंदोलनापासून आंदोलकांना परावृत्त करण्यासाठी आंदोलक प्रमुख सुरेशराव लांबे, मुळा पाटबंधारे राहुरी उपविभाग अभियंता विलास पाटील, व उपकार्यकारी अभियंता विद्युत महावितरण तान्हाजी भोर आदींना आंदोलनाच्या विषयावर चर्चेसाठी बैठकीचे नियोजन केले होते.

परंतु संबंधित अधिकारी काही कारणास्तव बैठकीस येऊ शकले नाही. त्यामुळे सौ.पुनम दंडीले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आम्ही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेशाप्रमाणे पत्र पाठवले होते. परंतु मुळा उजवा कॅनल वरील कुठल्याही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केलेला नाही. यावर नायब तहसिलदार दंडीले मॅडम यांनी लेखी पत्र मागितले असता विद्युत महावितरण राहुरी उपकार्यकारी अभियंता व मुळा पाटबंधारे उपविभाग अभियंता यांनी नायब तहसीलदार यांना त्यांच्या अधिकाराच्या मर्यादेत लेखी पत्र दिले. सदर दिलेल्या पत्रात समाधानकारक लेखी नसतानाही सध्याची वस्तुस्थिती पाहता लांबे पाटील यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले. यावर तहसीलदार सौ. दंडीले मॅडम यांनी आंदोलकांचे आभार मानले.

श्री. लांबे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, चालू वर्षी खरीप हंगामात अतिअल्प पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या होऊ शकल्या नाही. त्यातून ज्यांना अल्प प्रमाणात पाऊस झाला व थोडेफार पाणी होते त्यांनी पेरणी केली तीही जळून चाललेली असल्यामुळे मुक्या जनावरांचा चा-याचाही प्रश्न निर्माण झाल्यामुळे दि. 22 ऑगस्ट रोजी मुळा उजवा कॅनलला त्वरित पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यावर 28 ऑगस्ट रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाई आढावा बैठकीत 1 सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

परंतु त्यातच 5 सप्टेंबर पासून पुढील 20 दिवस कॅनल वरील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल असाही उल्लेख आदेशामध्ये निदर्शनास आल्याने या विरोधात सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता त्वरित दि. 1 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कॅनल वरील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास 8 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. परंतु 5 सप्टेंबर पासून आज तीन दिवसात मुळा पाटबंधारे विभाग व विद्युत महावितरण यांनी वैयक्तिक कॅनल वरील एकही कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे आढळून आले नाही व तशी एकही शेतकऱ्यांनी आमच्याकडे केली नाही. आम्हीही अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅनल वरील कृषी पंप चालू असल्याचे सांगितले व तसे निदर्शनास आले.

त्या अनुषंगाने आम्हाला सध्या स्थितीत आंदोलन करणे योग्य वाटत नसल्याने राहुरीचे नायब तहसीलदार सौ. दंडीले मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन 8 सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याने मुळा उजवा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी. परंतु मुळा उजवा कॅनल वरील शेतकऱ्यांना कृषी पंप चालविण्यास त्रास दिल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा प्रहारचे तालुकाध्यक्ष तथा शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button