राजकीय

पिंप्रीअवघडच्या सरपंचपदी सौ. प्रियंका बर्डे यांची बिनविरोध निवड

राहुरी – पिंप्री अवघडच्या मावळत्या सरपंच सौ.परविनबानो बादशहा शेख यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वखुशीने गेल्या महिन्यात सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाल्यामुळे मा तहसीलदार राहुरी यांनी पिंप्री अवघड ग्रामपंचायत नविन सरपंच पदाच्या निवडीसाठी आदेश काढुन अध्यासी अधिकारी म्हणुन राहुरी मंडल अधिकारी वैशाली अंबादास सोनवणे यांची नेमणुक करुन नियमाप्रमाने सर्व 9 सदस्यांना निवडीची नोटीस देऊन दि. 8 जुन रोजी सकाळी ठीक 10 वाजता नवनियुक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी पिंप्री अवघड येथील सर्व 9 ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलवली.

यावेळी नविन सरपंच निवडीच्या सभेला मावळत्या सरपंच सौ.परवीनबानो बादशहा शेख, सौ.रेखा बापु पटारे, सौ.प्रियंका विनोद बर्डे, सौ.मिनाक्षी सुर्यभान उर्फ सुरेशराव लांबे, शिवाजी सोपान लांबे, उपसरपंच बापु उर्फ लहानु सखाराम तमनर हे सहा सदस्य हजर होते तर तीन सदस्य गैरहजर होते. यावेळी सर्व निवडणुक कार्यक्रम अध्यासी अधिकारी यांनी पत्रकातील तपशीला प्रमाणे सुरवात केली. यावेळी पिंप्री अवघड लोकसेवा मंडळाचे प्रमुख व राहुरी तालुक्यातील सर्वसामान्यांचे शेतक-यांचे नेतृत्व सुरेशराव लांबे पाटील यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सौ.प्रियंका बर्डे यांना एक वर्षासाठी सरपंच करण्याचे पहिले जाहीर केलेले होते, त्याप्रमाणे सरपंच पदासाठी एकच पॅनल कडुन संमतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये सौ.प्रियंका विनोद बर्डे यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन मावळत्या सरपंच सौ.परवीनबानो शेख यांची स्वाक्षरी होती व प्रियंका बर्डे यांचा अर्ज मंजुर होण्यास काही तांत्रीक अडचण आल्यास पर्याय म्हणुन सौ.मिनाक्षी सुरेशराव लांबे यांचाही एक अर्ज डमी भरण्यात आला. या अर्जावर मा.सरपंच सौ.रेखा बापु पटारे यांची सुचक म्हणुन स्वाक्षरी होती, परंतु छाणनी नंतर दोन्ही अर्ज मंजुर झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी घोषीत केले. त्यानंतर सौ.मिनाक्षी सुरेशराव लांबे यांचा अर्ज वेळेत मागे घेण्यात आल्याने एका जागेसाठी एकच अर्ज शिल्लक राहील्याने अध्यासी अधिकारी वैशाली सोनवणे यांनी संपुर्ण कामकाज निपक्षपणे पार पाडले व सौ.प्रियंका विनोद बर्डे ह्या बिनविरोध सरपंच झाल्याचे जाहीर केले.

नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडी वेळी अध्यासी अधिकारी यांना राहुरी खुर्द तलाठी अधिकारी तुषार बाळासाहेब काळे, पिंप्री ग्रामविकास अधिकारी शुभांगी धोंडीराम चोखर, क्लार्क कृष्णा कारभारी कांबळे, पाणीपुरवठा कर्मचारी संजय पोपट वाघमारे यांनी सहकार्य केले. या निवडी प्रसंगी पिंप्री अवघड लोकसेवा मंडळाचे प्रमुख व राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांचे व शेतक-यांचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी लांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सर्वांना संबोधीत करत प्रस्थापित पुढाऱ्यांबरोबर त्यांचे कार्यकर्ते व गैरहजर असलेले काही व्यक्तीदोशी स्वार्थी सदस्य यांच्यावर नाराजी व्यक्त केली, पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की पिंप्री अवघड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक सन 2020 – 25 या कालावधीसाठी 9 जागेसाठी पिंप्री अवघड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व प्रस्थापित पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंडळाचे 9 उमेदवार उभे केले व माझ्या नेतृत्वाखाली लोकसेवा मंडळाचे 9 उमेदवार उभे केले अशा पद्धतीने दोन मंडळाने आपापले 9 जागेसाठी 9 उमेदवार उभे केले होते. त्यावेळी पिंप्री अवघडच्या मतदारांनी लोकसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडुन देऊन मतदारांनी, प्रस्थापितांच्या पैशाला, दमाला व भूलथापांना बळी न पडता ग्रामविकास मंडळाच्या सर्व उमेदवारांचा पराभव करून आपल्या लोकसेवा मंडळाला चौथ्यांदा एक हाती सत्ता दिली.

परंतु प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांचेच काही व्यक्तीदोशी निष्क्रिय हस्तक यांच्यामुळे आमचे काही अज्ञानी सदस्य, सरपंच पदाच्या स्वार्थापोटी विरोधात गेले व त्यांनी त्यांचेच नुकसान करून घेतले. प्रस्थापित पुढाऱ्यांनी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून सरपंच होण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु निवडणुकीत एकही रुपया न वाटता निवडुन आलेले लोकसेवा मंडळाचे सदस्य यांनी माझ्या नेतृत्वाचा स्वीकार करून प्रस्थापितांच्या आदेशाचा तसेच खोट्या अमीशाचा धिक्कार करत मागील वर्षी ही एक अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील महीला सौ.परवीनबानो बादशहा शेख या महीलेस सरपंचपदी निवड केली व आज ही एका आदिवासी समाजातील महिलेला सरपंच पदाचा मान देऊन तालुक्यात बहुजन समाजातील जनतेत माझी मान उंचावल्या बद्दल हजर असलेले सर्व सदस्यांचे लांबे यांनी मनापासुन आभार मानले व सर्वांना राजकारण विरहित सामाजिक कार्य करा असा अमोलिक सल्ला दिला.

इतर पक्षात काम करणाऱ्या गावातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन भाषण करताना सुनावले की या प्रस्थापित पुढाऱ्यांना आपल्या गावातील विकासाचे व तुमचे काही घेणे देणे नाही. परंतु मी तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नावर सतत आवाज उठवून यांना विरोध करून सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझा वाढता जनसंपर्क व लोकप्रियता बघता यांची झोप उडालेली आहे. म्हणुन ते माझ्याच गावातील माझ्याच लोकांना जवळ करून माझे राजकारण संपवण्याचा मोठा प्रयत्न करत आहेत हे तुम्ही समजुन घ्या. मि जर या प्रस्थापित पुढाऱ्यांसारखा स्वार्थी व लालची असतो तर माझी पत्नी सौ मिनाक्षी लांबे हिला सरपंच केले असते. पण मि अल्पसंख्यांकांना पद देऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असे मत मांडले. आपण सर्व एकत्र राहुन आपल्या गावातील विकासाला गती देऊ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देऊ अशी विनंती करुन गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी निवडी प्रसंगी आव्हान केले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांचे वडील नामदेव पवार अध्यक्ष एकलव्य परिषद, बापुसाहेब पटारे, मधुकर लांबे, बादशहा शेख, बबनराव बर्डे, जालिंदर पवार, तुकाराम शिंगाडे, राजु गायकवाड, दिपक बर्डे, भैय्या लांबे, व ईतर कार्यकर्ते हजर होते. निवडी नंतर सर्व अधिका-यांचा पिंप्री ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करुन स्वागत केले व उपसरपंच लहानुभाऊ तमनर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. या निवडीचे तालुक्यातुन स्वागत होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button