कृषी

शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून विशेष मोहिम

नगर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून 3 एप्रिल ते 30 जुन, २०२३ या दरम्यान शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेत 3 ते 10 एप्रिलपर्यंत तहसिलदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून गाडीमार्ग, पायमार्ग, पाणंद रस्ते, शिवरस्ते नमूद असलेले गावनकाशे प्राप्त करुन घ्यावेत. 12 एप्रिल, 2023 पर्यंत नकाशातील ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, पाणंदरस्ते, शिवरस्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणे. बंद असलेले रस्ते ज्या भुमापन क्रमांकातुन जातात त्यांच्या भोगवटाधारकांची यादी तयार करणे.

12 एप्रिल ते 30 जुन पर्यंत भोगवटाधारक व गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर संबंधितांची रस्ता खुला करण्यासाठी बैठक आयोजित करुन समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे. 30 जुन, 2023 पर्यंत रस्ता खुला होत नसल्यास उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्या मदतीने रस्ता निश्चित करुन तंटामुक्त समितीच्या मदतीने व आवश्यकता भासल्यास पोलीसांच्या सहकार्याने तो खुला करण्यात यावा.

रस्ते खुले करण्यासाठी वेळापत्रक निर्धारित करण्यात आले असले तरी वेळापत्रकापूर्वी रस्ते खुले करण्यात यावेत. त्याचा अहवाल विहित प्रपत्रामध्ये सादर करण्याच्या सुचना देत जे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते खुले करतील त्यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button