राजकीय
मिटकरी यांना यापुढे एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही – प्रतिक विधाते
राहुरी प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले, असे सत्य परिस्थितीला अनुसरून विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. सत्य परिस्थिती त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षामध्ये भूकंप झाला व त्यांचे अनेक नेते राज ठाकरे यांच्यावर टीका करायला लागले. परंतू राजकारणात एखाद्या टिकेला उत्तर देताना ते वैचारीक पध्दतीने दिले पाहिजे. तसे न करता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटणारे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रद्रोही असल्याचे आक्षेपार्ह ट्विट करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची मने दुखावली आहे. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेची तसेच राज ठाकरे यांची जाहिर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळात आमदार अमोल मिटकरी यांचा एकही कार्यक्रम राहुरी शहरात होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष प्रतिक विधाते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.