अहमदनगर

राहुरी तालुक्यातील वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची बालिका ठार

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान श्रीकांत रावसाहेब ढगे यांच्या वस्तीवर घडली.

सकाळी पावणे आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे अंगणात खेळत होती. गिन्नी गवतात बिबट्या लपून बसलेला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने पलायन केले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीररित्या जखमी झाली होती. कुटुंबीयांनी व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक सतीश जाधव, गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले.

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार वाढला असून शेजारी कृषि विद्यापीठ, मुळानगर, बाभुळगाव, बारागाव नांदुर आदि भागांत मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे. राहुरी तालुक्यात वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button