कृषी

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षीत शेतीचे तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल – विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील

महात्मा फुले कृषि विद्यापीठात संरक्षित शेती तंत्रज्ञानावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्रात पिकविल्या जाणाऱ्या द्राक्ष व डाळिंबामुळे महाराष्ट्राची देशभरात ओळख आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्या डाळिंबाच्या जाती देशभरातील 90 टक्के डाळिंब क्षेत्रावर लागवड केल्या जातात. शेतकऱ्यांना सधन करणाऱ्या या महत्वाच्या फळपिकांबरोबरच इतर महत्वाच्या पिकांना हवामानातील बदलाचा फार मोठा फटका बसत आहे. हवामानातील बदलामुळे गारपीटीसारख्या घटना होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील काटेकोर शेती विकास केंद्र आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षित शेती तंत्रज्ञानावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सी.एस. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन डिंगरे, प्रकल्प व्यवस्थापक सुभाष काटकर, उदय देशमुख व अहमदनगर येथील उद्योजक संदिप डेरे उपस्थित होते.

डॉ. कैलास मोते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की संपूर्ण देशभरातून फक्त महाराष्ट्रातच संरक्षित शेतीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न प्राधान्याने होत आहेत. संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान या मास्ट्रर्स ट्रेनर्सच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात राबविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या हवामानातील बदलामुळे शेती क्षेत्रावर अनिष्ठ परिणाम होत आहे. द्राक्ष तसेच डाळिंबासारख्या महत्वाच्या फळपिकांना प्लॉस्टिक कव्हरच्या आच्छादनाने गारपीटीसारख्या संकटापासून वाचविता येवू शकते. याकरीता संरक्षीत शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनात महत्वाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

डॉ. दिलीप पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की देशातील अन्य ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रात अशा पध्दतीच्या कार्यशाळा कायम होत असतात. जगभरात संरक्षित शेती तंत्रज्ञानात होणाऱ्या नविन संशोधनाचा वापर आपण करायला हवा. सध्याच्या बदलत्या हवामानात संरक्षित शेतीच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे यावेळी ते म्हणाले. पुणे येथील प्रकल्प व्यवस्थापक सुभाष काटकर यांनी या कार्यशाळेविषयीचा उद्देश विषद केला. या कार्यशाळेत इंजि. हेमंत जगताप, इंजि. सचिन मोरे, सुभाष काटकर व संदिप डेरे यांनी हरितगृह/शेडनेटगृह उभारणी विषयीचे तंत्रज्ञान, तांत्रिक निकष तसेच द्राक्ष पिकासाठी प्लॉस्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञान व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. हेमंत जगताप यांनी तर आभार डॉ. सचिन डिंगरे यांनी मानले. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्यातील 110 पेक्षा जास्त उपविभागीय कृषि अधिकारी, तांत्रिक अधिकारी व कृषि अधिकारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button