ठळक बातम्या

इपीएस ९५ पेन्शनधारकांचे १२ डिसेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन; श्रीरामपूर बैठकीत निर्णय

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा अद्याप निर्णय न झाल्याने दि १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे देशातील महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर यांच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील टिळक वाचनालय येथे आज झालेल्या पेन्शनर्स संघटना बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना गेली १२ वर्षे लढा देत आहे तरी पेन्शनवाढ करण्यात आली नाही. २०१२ या वर्षी खा.भगतसिंह कोशियारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तीन हजार रुपये पेन्शनवाढ करावी अशी शिफारस केली होती. परंतु केंद्र सरकारने २०१४ या वर्षी एक हजार रुपये मंजूर केली. ही पेन्शन अत्यल्प असून दैनंदिन गरजा भागविता येत नाही. दि २० एप्रिल २३ रोजी व २९ ऑगस्ट रोजी लोकसभा सेक्रेटेरीएट पार्लमेंट हाउस दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांनी पेन्शनधारकांच्या मागणीसाठी पेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित केली होती, त्याची माहिती आज दिली.

तीन हजार रूपयांची शिफारस अंमलात आणली असती तर आज पेन्शन ८ ते ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळाली असती. त्यासाठी १२ वर्षे आंदोलने केली पण पदरात काही आले नाही. पंतप्रधान यांनी अनेक घोषणा केल्या व शेतकरी, कामगार आदींना भरघोष अनुदान देण्याच्या घोषणा केल्या पण लाखो रुपये जमा करणाऱ्या पेन्शनधारकांना दरमहा ८०० ते १५०० पर्यंत पेन्शन दिली जाते हा अन्याय असल्याचे मनोगत या बैठकीत संघटना अध्यक्ष एस एल दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, त्रिंबक घुगरकर, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, उपाध्यक्ष अंकुश पवार, चिटणीस भागीनाथ काळे आदींनी व्यक्त केले.

नोव्हेंबर अखेर पेन्शनवाढीचा निर्णय न झाल्यास येत्या १२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, खा.सुजय विखे यांना देण्यात आले आहे. देशातील पेन्शनधारकांनी रेल्वेची तिकिटे अगोदरच काढून घ्यावी. महाराष्ट्रातून ५० हजार व देशातून २ लाख कर्मचारी दिल्लीत आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास उपाध्यक्ष बाबुराव दळवी व अंकुश पवार यांनी व्यक्त केला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button