शिवसेना ठाकरे गटाकडून फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-09-02_19-53-31-923-780x470.jpg)
राहुरी | अशोक मंडलिक : जालना येथे झालेल्या लाठी हल्ला या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हा दक्षिणचे सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केली आहे. या घटनेचा निषेध करीत खेवरे यांच्यासह पदाधिकार्यांनी राहुरीचे तहसीलदार राजपूत यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते. त्यांचे उपोषण शांततेच्या मार्गाने चालु असताना त्यांना पोलीसांनी उपोषणापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता उपोषणार्थी व पोलिसांत शाब्दीक चकमक झाली. त्याचा परिणाम म्हणुन पोलीसांनी अंदोलकांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला. अश्रु धुर सोडून अंदाधुंदपणे हवेत गोळीबार करून लहान मुले व महिलांना जबर जखमी केले.
सदर उपोषणार्थी हे पोलीसांना पुर्ण सहकार्य करत असताना जाणीवपुर्वक मराठा समाजाचे आरक्षण उधळून लावणेसाठी हा लाठीचार्ज व गोळीबार घडवून आणला असुन अहमदनगर जिल्हा शिवसेना जाहीर निषेध करत आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारून राज्याचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे अंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
या निवेदनावर शिवसेना सह संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, डॉ संजय म्हसे, सचिन म्हसे, संतोष येवले, बाबासाहेब मुसमाडे, संजय येवले, ईश्वर कुसमुडे, विजय सिरसाठ, विलास जाधव, रोहन भुजाडी, दत्तु गागरे, धनंजय आढाव, सुनिल शेलार, कैलास कोहकडे, धनंजय गागरे, नाना कुसमुडे, पोपट शिरसाठ, विलास ढोकणे, कैलास अडसुरे, सयाजी श्रीराम, नाना करमड, राजेद्र सातभाई, कैलास शेळके, सचिन तनपुरे, फौजी घुगरकर, संदीप आढाव, ठकसेन हारदे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या असुन या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.