शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकरी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2023/08/Picsart_23-08-19_15-03-16-883.jpg)
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राबवत असलेल्या नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या सहभागी महिला शेतकरी सविता वैभव नालकर यांना महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री ना. धनंजय मुंढे यांचे हस्ते “वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
पुसद, जि. यवतमाळ येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा 44 वा स्मृतिदिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंढे अध्यक्षस्थानी होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे शेतीमध्ये नवीन उपक्रम राबवून शेती फायदेशीर करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मौजे चिंचविहिरे ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील महिला शेतकरी सौ.सविता वैभव नालकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. सविता वैभव नालकर या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राबवत असलेल्या नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या सहभागी महिला शेतकरी असून त्यांनी शेततळ्यातील मत्स्यपालन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अवलंब केला तसेच एकात्मिक शेती पद्धती करताना डाळिंब लागवड, बाजरी, तुर, रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन करून शेतकरी प्रथम प्रकल्पात सहभागी झाल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी आ. निलय नाईक, आ. इंद्रनील नाईक, माजी मंत्री व प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक मनोहर नाईक, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर, पुरस्कार निवड समिती प्रमुख ययाती नाईक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अनिरुद्ध पाटील, निळकंठ पाटील, जयंतराव पाटील, उत्तमराव जाधव व सचिव उत्तम रुद्रवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार आणि प्रकल्प प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी सौ.नालकर यांचे अभिनंदन केले.