कृषी

माती व पाणी परिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज- संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : माती व पाणी परिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून शेती निविष्ठांचा वापर काटेकोरपणे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. यासाठी माती व पाणी परिक्षणावरील प्रशिक्षण गरजेचे असून त्याकडे प्रत्येक संस्थेने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मृद विज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसांचे माती व पाणी परिक्षणावर आधारीत सशुल्क प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. या माती व पाणी प्रशिक्षणावर आधारीत पहिल्या प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, माजी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, मृद विज्ञान विभाग प्रमुख व प्रशिक्षणाचे संचालक डॉ. बी.एम. कांबळे, प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. रीतु ठाकरे व डॉ. श्रीगणेश शेळके उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार पुढे म्हणाले की जी.पी.एस. वर आधारीत माती नमुना घेणे याचा समावेश पुढील प्रशिक्षणात करण्यात यावा. प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणाचा किती फायदा होतो याचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. डॉ. श्रीमंत रणपिसे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या प्रशिक्षणामुळे सर्व प्रशिक्षणार्थींचे माती पाणी परिक्षणाचे ज्ञान अद्ययावत होणार आहे. प्रशिक्षणार्थींनी आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांच्या माती व पाण्याच्या नमुना तपासण्यासाठी व त्याचे जास्तीत जास्त चांगले निष्कर्ष समजण्यासाठी करावा. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रशिक्षणावर आधारीत पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुलेच्या प्रतिमेचे पुजन करुन आणि विद्यापीठ गिताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. बी.एम. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रीतु ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी 11 जिल्ह्यातून कृषि विज्ञान केंद्रे, कृषि महाविद्यालये व माती परिषण प्रयोगशाळा, खाजगी संस्थेतील 22 तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button