अहमदनगर

अखेर ९ दिवसांच्या उपोषणानंतर शिवरस्ता खुला करण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन

राहुरी – तालुक्यात सन 1970-71 साली मुळा धरण प्रकल्प उभारण्यासाठी अनेक गावातील शेतक-यांनी आपले राहते घर, जमीन देऊन प्रकल्प होण्यासाठी शासनाला व प्रशासनाला सहकार्य केले. त्या मोबदल्यात ईतर ठिकाणी जमीन व नोकरी देण्याचे शासनाने कबुल केले. काही प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अजुनही नोकरी मिळाली नाही, तर काही शेतक-यांना पुनर्वसनात शेती मिळाली.

त्यातील कै.विठ्ठल गर्भाजी दोंदे हे एक प्रकल्पग्रस्त शेतकरी असुन ते काही वर्षांपुर्वी मयत झाले. त्यांना केंदळ खुर्द शिवारात गट नंबर 183/2 क्षेत्र 81 आर जमीन शासनाने दिली. परंतु त्या जमिनीत जाण्यासाठी आजपर्यंत हक्काचा रस्ता दिलेला नाही. ज्या पाणी प्रकल्पासाठी घरदार गाव सोडले, त्या प्रकल्पाचे पाणी ही या प्रकल्पग्रस्त शेतक-याला आजपर्यंत मिळाले नाही, ही बाब अतिशय लाजीरवाणी असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सुरेशराव लांबे व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना श्री. लांबे पाटील म्हणाले की, केंदळ खु येथील श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे, अशोक विठ्ठल दोंदे, सर्जेराव रावसाहेब पवार, बाळासाहेब दगडु पवार, राजेंद्र रावसाहेब पवार, सिंधु सर्जेराव पवार यांची शेत जमीन केंदळ खुर्द शिव लगत आहे. या सर्व पिडीत शेतक-यांनी अनेक वर्षांपासुन शासनाकडे केंदळ खुर्द व चंडकापुर शिव रस्ता खुला करण्यासाठी मागणी केलेली असुन त्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांचे पत्र ही तहसिलदारांना दिले. तरीही तहसिलदारांना भुमि अभिलेख विभाग व मुळा पाटबंधारे विभाग यांच्या स्थानिक माहीती अहवालात शिवरस्ता येथे पाट चारी आहे असे लेखी नमुद केल्यामुळे तहसिलदार यांना निर्णय घेणे कठीण झाले, असे सांगितले.

या आंदोलन स्थळी राहुरीचे तहसिलदार राजपुत, श्रीरामपुर विभाग पोलीस अधिक्षक संदीप मिटके, राहुरीचे कर्तव्यदक्ष पी आय मेघशाम डांगे यांनीही पिडीत आंदोलकांबरोबर चर्चा करुन उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांना कुठलेही लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे त्यांनी जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर कु. सायली पाटील यांच्याकडे दि.17 मे 2023, बुधवार रोजी दुपारी धाव घेतली व तहसिलदारांकडे आलेले अहवाल अमान्य करुन आपले लेखी म्हणणे सादर केले.

यावेळी सायली पाटील यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते राजुभाऊ आढाव व ईतर कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकुन सविस्तर चर्चा केली व मला आठ दिवस द्या मि स्वतः पडताळणी करुन स्थळ निरीक्षण करते व तहसीलदारांना अहवाल पाठवते अशी लेखी ग्वाही दिली. तुम्ही उपोषण सोडवा, आंदोलकांनी नऊ दिवस कोणाचेही न ऐकता उपोषण सुरु ठेवले होते. मात्र त्याच दिवशी त्वरीत नगरहुन राहुरी तहसिल आंदोलन स्थळी मुळा पाटबंधारे अभियंता कु.सायली पाटील या सायंकाळी 6 वाजता हजर झाल्या व चर्चा केली. आंदोलकांनी विश्वास ठेवत दि. 9 मे रोजी सुरु केलेले उपोषण 17 मे रोजी सायंकाळी नवव्या दिवशी सोडले. यावेळी अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागीय अभियंता कु.सायली पाटील, राहुरी तहसिलच्या नायब तहसिलदार सौ.दंडीले, औटी यांच्या पुढाकाराने आंदोलकांना लिंबु पाणी शरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.

या उपोषणाला मुख्य पाठींबा व नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव, यमुनाताई भालेराव, प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ शेटे, वंचित जि.अध्यक्ष विशाल कोळगे, ता.अध्यक्ष संतोष चोळके, जि.संघटक अनिलराव जाधव, बाबासाहेब मकासरे, भारत जगधने, मच्छिंद्र गावडे, दत्तात्रय पवार, केंदळ खु सरपंच, ग्रामस्थांसह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठींबा देऊन पिडीतांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button