मधमाशी प्रकल्पकार प्राचार्य औताडे यांचा आदर्श घ्यावा -डॉ. बाबुराव उपाध्ये
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2023/04/Picsart_23-04-12_21-49-19-750-780x470.jpg)
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील प्रा. ऋषिकेश औताडे यांनी स्वतंत्रपणे मधुमाशी पालन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यांचा आदर्श आजच्या शेतकरी युवकांनी घेतला पाहिजे, असे मत इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील प्राचार्य ऋषिकेश औताडे ( मास्टर ट्रेनर, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ) संचालित गोदागिरी फार्म्सच्या मधमाशी पालन विभागाला डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भेट देऊन पाहणी केली. प्राचार्य औताडे यांनी मधमाशी पालन व त्यातून व्यवसाय निर्मिती बाबत सखोल माहिती दिली. डॉ. उपाध्ये यांनी औताडे परिवाराचे कौतुक केले. जवळच असलेल्या मधुबनामध्ये तीन प्रकारच्या ( युरोपियन, भारतीय व स्टिंगलेस ) मधमाश्या प्रत्यक्ष हाताळता आल्या व मधमाशी करोडो वर्षांपासून करत असलेल्या मधनिर्मिती बरोबरच निसर्गाच्या उत्पत्ती व चिरकाल टिकण्यासाठी लागणारे परागीभवन मोफत करत आहेत.
त्याचबरोबर त्यांची पत्नी सौ. रुपाली औताडे ह्या 4 ते 14 वर्षांच्या महाराष्ट्रातील व भारताबाहेरील विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन फॉनिक्स, इंग्रजी व्याकरण, अबकस, रुबिक क्युबइ. विषयांमध्ये मानवता एलिगंट किड्स अकॅडमी द्वारे प्रशिक्षण देत असल्याची माहिती डॉ. उपाध्ये यांना मिळाली. तसेच, त्यांची मुलगी मनवा हिच्या हातून मध व खपली गहू बिस्कीट याची नैसर्गिक चव चाखता आली. अनुक्रमे 11 व 3 वर्षे शिक्षक- शिक्षिका म्हणून औताडे पती-पत्नी यांनी काम केल्यानंतर व्यवसायत प्रदार्पण व त्याचबरोबर निसर्ग जोपासना, प्रशिक्षित कौशल्य विकास ते करत आहेत.
गोदागिरी फार्म्सद्वारे मधमाशी पालनाबरोबरच गांडूळ खत, धिंगरी अळिंबी, खपली गहू व मध उत्पादन केले जात आहे. त्याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी आजचा शेतकरी पूत्र कुठेच कमी नाही फक्त बौद्धिक इच्छशक्ती, निसर्गदृष्टी आणि शेतीमातीवर प्रेम करणारी मानसिकता असेल तर आजही शेती म्हणजे श्रीमंतीच होय, असेही डॉ. उपाध्ये यांनी प्रेरणादायी उदगार काढले. हरिभाऊ औताडे यांनी विशेष सहभाग घेत आभार मानले.