कृषी

कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या डाळिंब बागांना भेटी

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उबंरे या गावाला विस्तार शिक्षण संचालक तथा प्रकल्प समन्वयक व वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, अखिल भारतीय समन्वीत कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, हॉर्टसॅप प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. प्रविण खैरे, वांबोरीच्या मंडळ कृषि अधिकारी श्रीमती विनया बनसोडे, राहुरीच्या कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाडे व उबंरे येथील कृषि सहाय्यक श्रीमती कल्पना थोटे यांनी भेटी दिल्या.
भेटी दरम्यान कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चे दरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. सध्या शेतकर्यांच्या डाळिंब पिकावर रसशोषण करणार्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये फुलकिडे या किडींचा व बुरशीजन्य मर, फल व पानावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने किड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. तसेच डाळिंब पीक किड व रोग नियंत्रण सल्ला यांच्या 20 प्रति शेतकर्यांना देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button