ठळक बातम्या

प्रस्थापितांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-छत्रपती संभाजीराजे

छावा क्रांतीवीर सेनेच्या विलीनकरणाने स्वराज्याची ताकद द्विगुणित
संगमनेर शहर : रयतेच्या प्रश्नावर सतत संघर्ष करणारी छावा क्रांतीवीर सेना स्वराज्यात विलीन झाल्याने संघटनेची ताकद शत पटीने वाढली असून समाजकारण आणि राजकारणात प्रस्थापित होऊन सामान्यांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तींच्या उरात धडकी नक्कीच भरेल असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज, स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे आयोजित छावा क्रांतीवीर सेनेचा नववा वर्धापन दिन तसेच संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. याच सोहळ्यात छावा क्रांतीवीर सेना संघटना स्वराज्य संघटनेत विलीन केल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून स्वराज्य संघटना आणि छावा क्रांतीवीर सेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते आणि शिव प्रेमी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजें यांचे सोबत व्यासपीठावर मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे, शिवाजी सहाणे, स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर, स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर, माधव देवसरकर, सदाशिव माळी, हेमलता कांडेकर, प्रमोद जाधव, सविता गायकर आदींसह छावा क्रांतिवीर सेनेची प्रदेश कार्यकारणी, विभागीय कार्यकारणी सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी स्थानापन्न होते.
यावेळी जाहीर सभेला संबोधित करतांना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, सामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला या सर्व घटकांच्या मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तर वर्षातही पुर्ण होऊ शकल्या नाहीत. शेतकरी सर्वच बाजूने नडला जातो, शेती मालाला हमी भाव नाही. अनेकदा फसवणूकीला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दिशा निश्चित करण्यात राजकारणी अपयशी ठरले आहे. कामगार, शेत मजुरांची पिळवणूक सुरु आहे. महिला सबलीकरणाच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठाही धोक्यात आहे. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहकार्याने उभे केलेले स्वराज्य अडचणीत आल्यानेच स्वराज्य संघटना स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गाव तिथं स्वराज्य आणि घर तिथं मावळा या उद्देशाने गावोगाव शाखा स्थापन होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेत गेल्या पंधरा वर्षांपासून ऋणानुबंध असलेले महाराष्ट्राचे युवा नेतृत्व करण गायकर यांचा सिंहाचा वाटा आहे. करण गायकर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने नेतृत्व देऊ शकतील असे नेतृत्व गुण त्यांच्यात आहेत. म्हणूनच त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. त्याग काय असतो, याचे उत्तम उदाहरण करण गायकर यांनी रक्ताचे पाणी करून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात वाढवलेली छावा क्रांतीवीर सेना संघटना स्वराज्य संघटनेत विलीन करून दाखवून दिले आहे. स्वराज्याच्या मोहिमेत तत्कालीन मावळ्यांनी आपले सर्वस्व छत्रपतींच्या चरणी अर्पण केले, हिराजी इंदुलकर यांनी प्रसंगी आपला गावचा वाडा विकून स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर रायगड उभा केला. आज एकवीसाव्या शतकात करण गायकर यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असलेली संघटना म्हणून नाव कमावलेली छावा क्रांतीवीर सेना स्वराज्याच्या पदरात घालून तितक्याच तोलामोलाचा त्याग केला आहे. त्यातून स्वराज्याची वाढलेली ताकद प्रस्थापितांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींचा वंशज म्हणून एकाही छाव्याला वाऱ्यावर सोडणार नाही हे वचन देतो.
अभिजीत राणे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना, करण गायकर माझा छोटा भाऊ आहे, त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील पत्रकारांचा सच्चा मित्र आहे. मन मोकळे पणाने पत्रकारांशी हितगुज करून रोख ठोक भूमिका मांडणारे फार कमी कार्यकर्ते समाजकारणात आणि राजकारणात आहेत, त्यात करण गायकर पहिल्या पंक्तीत बसतात. स्वराज्य संघटनेला अशा नेतृत्वाचा नक्कीच फायदा होईल.
अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना करण गायकर यांनी स्वराज्य संघटना, छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून प्रस्थापित राजकारण्यांनी निर्माण केलेल्या शोषित व्यवस्थेवर टिकेची झोड उठवली. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशी दिशाभूल करून राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी आपली सारी संपत्ती मराठा समाजाच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी दान करून टाकावी, त्यानंतर मराठा समाज आरक्षण मागणार नाही असे सडेतोड भाष्य करून शरद पवार यांच्यावर टीका केली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख आशिष कानवडे, रोहित यादव, संजय चौधरी, शांताराम गायकवाड, संदीप राऊत, गणेश थोरात, संदीप वरखडे, भागवत कानवडे, रामनाथ कानवडे, सचिन कानवडे, राहुल कानवडे, गणेश फरगडे, आमिन शेख, सागर कानवडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button