ठळक बातम्या

राज्याबाहेरील डोंगर झाडीपेक्षा अधिक डोंगर नि झाडी तालुक्यात आहेत, विरोधी बाकावर बसून विकास कामात खंड पडू देणार नाही – माजी मंत्री तनपुरे

राहुरी | बाळकृष्ण भोसले – राज्यात विरोधी बाकावर असले तरी विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही. विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
आज राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथील सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री तनपुरे म्हणाले की, राज्यात गेल्या ४० दिवसापासून एकच मंत्री सरकारमध्ये होता. त्यामुळे सर्वच कामे ठप्प झाली. विकास कामांचा पुरता खेळ खंडोबा झाला. विरोधी विभागावर असलो तरी कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. गेल्या दहा वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या अडीच वर्षात पुर्ण प्रयत्न केले. यापुढेही कार्यरत राहू. निळवंडे धरणाच्या कामाला महाविकास आघाडीच्या काळात गती देण्यात आली. या कामी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले होते. बोगद्याचे काम कोणताही गाजावाजा न करता काम करण्यास प्राधान्य दिले.
केंद्र व राज्य सरकारच्या मिळून जलजीवन मिशन योजना मतदार संघात राबविली. या कामी अनेक बैठका घेतल्या. ऊर्जा खात्याच्या माध्यमातून नवीन विद्युत जनित्रे, सब स्टेशन व सौर ऊर्जा प्रकल्प उभारले. रस्त्याच्या कामांना निधी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन करणार नाही. मंत्री पदाचा अनुभव असल्याने कमी काळात कोणती अडचण भासणार नाही. मतदार संघातील विविध गावात खोल्यांची दुरावस्था कायमची मिटविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. स्पर्धेच्या युगात डिजिटल संगणक दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी भागातील विद्यार्थ्यांची बरोबरी करू शकतील. ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी अधिक सहकार्य केले असते तर आणखी कायापालट करता आला असता अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गुवाहाटी येथील डोंगर झाडीपेक्षा अधिक झाडी डोंगर या भागात असल्याचे सांगत टोला लगावला. शिंदे फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही असे भाकीत वर्तविले.

 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. आदिवासी नागरिकांनी तनपुरे यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादीचे किरण कडू, ग्रामपंचायत सदस्य स्वाती साबळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सरपंच साधना शिंगोटे, उपसभापती मुक्ताजी खाटेकर, रघुनाथ मुसमाडे, अनिल शिरसाठ, सुजीत वाबळे, बाळासाहेब शिंगोटे, अविनाश ओहोळ, सुयोग नालकर, भास्कर गाडे, तुकाराम सरोदे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button