शिक्षणवारी ज्ञान पंढरी

ग्रामीण भागातील समस्यांवर प्रकाश टाकणारे शिबीर यशस्वीरित्या संपन्न

राहुरी | जावेद शेख : काटोल तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, आजनगाव येथे शैक्षणिक ग्रामीण शिबीराचे आयोजन मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने दि. १७ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार समाजकार्य प्रात्यक्षिक अंतर्गत हे शिबिर आयोजित केले गेले. या शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.३० वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी भूषवले. शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, नागपूरचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती निशीकांत नागमोते, आजनगावचे सरपंच अश्विनी नागमोते, पोलिस पाटील वामन वंजारी, गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर, बोरी उपसरपंच प्रफुल्ल गजभिये, जि प शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पठाडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सहारे उपस्थित होते.

या शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती, समस्या आणि त्यावर उपाय योजना या विषयांवर अभ्यास केला. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध जागरूकता कार्यक्रम आयोजित केले. शिबिर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ग्राम स्वच्छता व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण शिबिरार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. दुपारच्या बौद्धिक सत्रात दररोज अनेक सामाजिक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. यात दिलीप गोडे ( ग्राम विकासात सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका ), डॉ. सुनील मेश्राम ( समाजकार्य आणि निधी उभारणी ) या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच दैनिक ग्राम स्वच्छता रॅली व गाव सहवलोकन यासारखे विविध उपक्रम शिबिरादरम्यान घेण्यात आले.

ग्रामीण शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते. सोबतच सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेकडून अतिथींचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराचा उद्देश ग्रामीण समस्यांची जाणीव करून घेणे आणि त्यावर आपल्या अभ्यासातून उपाय सुचवणे हा असल्याने शिबिर घेणाऱ्या गावातील समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. शिबिर ग्रामीण भागातील शिक्षणाच्या उन्नतीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत प्राचार्य अरविंद बंसोड यांनी व्यक्त केले.

शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिबिर प्रमुख प्रा डॉ सतीश ढोके, सहप्रमुख डॉ प्रा कल्पना उकंडे, प्रा डॉ करुणा गोवर्धन, प्रा डॉ हेमलता नागमोते, हेमंत चौधरी, दिनकर बाविस्कर, देवानंद तायडे, राजू एकटिया, प्रमोद गजभिये, जितेंद्र बनसोड यांनी विशेष सहकार्य केले. गावातील बहुसंख्य महिला पुरूष नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button