अहमदनगर

श्रीरामपुरात उपोषण, रास्तारोको आणि बंदचाही सकल मराठा समाजाचा इशारा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राज्य शासनाने दोन दिवसात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आमरण उपोषणाचा निर्णय मार्गी लावावा. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली सगेसोयरे अधिसूचना मंजूर करून कायदा संमत करण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावावे, अशी मागणी सकल मराठा समाज श्रीरामपूरने केली आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर मर्चट असोसिएशनने या मागणीला पाठिंबा दिला आहे.

श्रीरामपूर शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक व इतरांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता श्रीरामपूर बंद न ठेवता मर्चट असोसिएशन, व्यापारी बांधव व सकल मराठा समाजाने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांना एकत्रितपणे निवेदन दिले. याप्रसंगी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी निवेदन स्वीकारले आणि आपल्या भावना व मागण्या राज्य शासनापर्यंत पाठवण्यात येईल असे सांगितले.

यावेळी मर्चट असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ मुन्ना झंवर यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. तर सकल मराठा समाजाचे नागेश सावंत, सुरेश कांगुणे, केतन खोरे, श्रीकृष्ण बडाख यांचीही भाषणे झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचे उपोषणाचा प्रश्न मिटला नाही तर श्रीरामपुरातही आमरण उपोषण, साखळी उपोषण, श्रीरामपूर बंद, रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दिला.

श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. त्यामुळे शासनाने याबाबत लक्ष घालून सदरचे उपोषण सोडण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. तसेच राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे उल्लेख असलेली अधिसूचना जारी केलेली आहे. त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी लवकर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्याला मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी शहरातील व्यापारी बांधव पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बेलापूर, रामगड येथील अनुभाई सय्यद व बेलापूर ग्रामपंचायतच्या माजी सदस्या करीमाबी सय्यद यांनी मुस्लिम समाजातर्फे उपस्थित राहून पाठिंबा दिला.

यावेळी प्रांताधिकारी कार्यालय येथे श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया, प्रवीण गुलाटी, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, धर्मेश शाह, प्रेमचंद कुंकूलोळ, अनिल लुल्ला, राहुल कोठारी, निलेश बोरावके, दत्तात्रय धालपे, रंगनाथ माने, ॲड. बाळासाहेब आगे, संजय गांगड, किरण गायधने, सुधीर तावडे, राजेंद्र मोरगे, अमोल बोबले, शरदमामा नवले, राजेंद्र भोसले, प्रसाद खरात, बाळासाहेब मेटे, दत्ता जाधव, धनंजय खंडागळे, संजय सोनवणे, उत्तमराव डांगे, संदीप आसने, संदीप गायकवाड, मनोज होंड, बी. जी. गायधने, लक्ष्मीकांत शिंदे, अमोल जैत, बाळासाहेब भोसले, चंद्रकांत काळे, दत्तात्रय पठारे, रमेश नवले, रावसाहेब तोडमल, तुषार पवार, शशिकांत शिंदे, ऋषिकेश मोरगे आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button