लोकाभिमुख विकासकामामुळे महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता – ना.विखे पाटील
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2023/12/Picsart_23-12-31_20-16-35-428-780x470.jpg)
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ज्यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला व विकासकामासाठी योगदान दिले अशा सर्व विभूतीना अभिवादन करतो. तसेच स्व.खा बाळासाहेब विखे यानाही अभिवादन करतो. गणेशराव मुदगुले यांनी शिरसगाव येथे इतिहास घडविला. हरीबाबाचे दर्शन झाले त्यांनी सर्वाना चारी धाम दर्शन घडविले, गोमाता रक्षणासाठी प्रयत्न केले. तीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु ठेवली. श्रीरामपूर तालुक्यात झालेले परिवर्तन पाहून श्रीरामपूर भाजपमय होताना दिसतोय.
तीन राज्यात निवडणुका झाल्या त्यात जनतेने एकच विचार केला तो म्हणजे विश्वनेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागची ९ वर्षात केलेल्या निर्णयातून जे समाज परिवर्तन काम झाले. गरीब माणसाला आधार देण्याचे काम झाले. नवीन कोविडची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागे सर्वांना मोफत लसीकरण झाले. देशातील ८० टक्के जनतेला मोफत धान्य मिळतेय. त्यास २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रेशनकार्ड कोणतेही असो आयुष्यमान भारत योजना सुरु झाली. मोफत दवाखाना उपचार मिळाले. महिलांसाठी ग्रामपंचायतला ५० टक्के व विधानसभा, लोकसभेला ३३ टक्के आरक्षण निर्णय नुकताच घेतला. एसटी बसेसमध्ये महिलांना भाडे सवलत दिली.
या सरकारने “तुमचे कुटुंब आमची जबाबदारी” कार्य सुरु केले. शेतकऱ्यांना २१ कोटी २२ लाख रु नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा केले. हे काम करणारे आपले व मोदींचे सरकार आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला. खंडकरी जमिनी वर्ग १ मध्ये घेण्याचा मोठा निर्णय झाला. आकारी पडीत जमिनीचा प्रश्न महिन्या दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही.
शिर्डी एमआयडीसी साठी ५०० एकर शेती महामंडळाची जमीन घेतोय, जे शिर्डीला उद्योग येतील तेच श्रीरामपूर एमआयडीसीला येतील. त्यामुळे श्रीरामपूरकरांच्या मुलांना रोजगार मिळेल. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रु दिले आहेत. त्यात तीन महिन्यात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्मारक उभे राहतील, असे प्रतिपादन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांनी शिरसगाव येथे तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य सत्कार प्रसंगी केले.
प्रास्तविकात तालुकाध्यक्ष दिपकअण्णा पटारे यांनी सांगितले की, शिरसगाव येथे तिरंगी लढतीत ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या गटास मतदारांनी निर्विवाद सत्ता गणेशराव मुदगुले व सहकारी यांच्यामुळे मिळाली. तालुक्यात अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या आहेत. ना.विखे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होतील. त्यांनी केलेली विकासकामे पाहूनच मतदान झाले. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. स्व.खा.बाळासाहेब विखे यांच्या पुण्यस्मृती निमित्त सत्काराचा कार्यक्रम होत आहे. या तालुक्याला ना.विखे यांनी १५ कोटी रु दिले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपकअण्णा पटारे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, जेष्ठ कार्यकर्ते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब पवार, भीमा बागुल, प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे, उपसभापती अभिषेक खंडागळे, शरदराव नवले, मंजुषा ढोकचौळे, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, सुरेश मुदगुले, ग्रामसेवक पी डी दर्शने, बी एल कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन संतोष मते तर आभार प्रदर्शन गणेशराव मुदगुले यांनी केले.