अभियंत्यांना त्यांच्या हक्काची कामे मिळावी – कानवडे
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2023/07/Picsart_23-07-27_22-24-09-730-780x470.jpg)
संगमनेर शहर : गेली काही वर्षे बेरोजगार अभियंता काम वाटप समितीकडे कामे न पाठवल्याने असंतोष निर्माण झाल्याने लवकरच अभियंत्यांना एकत्र येण्याचे आव्हान करून न्याय मिळविण्यासाठी आंदोलन उभे करणार असल्याची माहिती महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष कानवडे यांनी दिली.
अभियंत्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विनानिविदा काम वाटपासंबंधी शासकीय अध्यादेशाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग, या कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून हितसंबंधी मजूर संस्थांना अभियंत्यांच्या हक्काच्या रोजगाराची कामे दिली जात आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पदवीधर होऊन ही अभियंत्यांना आज त्यांच्या हक्काची कामे मिळत नाहीत. तसेच न्यायालयीन आदेशाचा देखील अवमान होत आहे.
गेल्या ५ वर्षात अभियंत्यांना कामे न दिल्याने मोठा अनुशेष निर्माण झाला असून अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्याने मागण्या मान्य न झाल्यास अभियंत्यांना एकत्र करून आंदोलन करण्यात येणार आहे. अभियंता काम वाटप समितीचे नवीन कार्यपध्दती अवलोकन करून त्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर, जलसंपदा विभाग, वनविभाग यांच्याकडे करण्यात आली. सदर निवेदनावर असोसिएशनचे उपाध्यक्ष देवेंद्र इंगळे, सचिव अजिंक्य वरपे, कोंडाजी कढनर आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.