राहुरी शहर / अशोक मंडलिक : गेल्या काही दिवसांपासून अचानक पांढऱ्या सोन्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रति क्विंटल १२०० ते १३०० रुपयांनी भाव अचानक कोसळले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये गावोगावी खाजगीरित्या कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला 6 हजार रुपयांपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. नऊ हजार प्रति क्विंटल पर्यंत कापसाला भाव गेला होता. मात्र, काही दिवसांपासून अचानक कापसाचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. यंदा कपाशी पिकामध्ये 35 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादनामध्ये घट झाली आहे. तरी कापसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पटीने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, अचानक भाव कमी झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
आणखी कपाशी या पिकाला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, भाव वाढण्याऐवजी कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विक्रीसाठी बाजारात आणावा लागत आहे. खाजगी व्यापारी कापूस खरेदी करून परराज्यांमध्ये पाठविला जात आहे. भाव का? कमी झाले यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे. 7 हजार 600 रुपये पर्यंत इतका भाव कमी झाला आहे. कपाशी पिकाला भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी बऱ्यापैकी साजरी झाली. मात्र ,अचानक कापसाचे भाव कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कापसामध्ये निघणारी सरकी बी ही एक तेल बी आहे. या तेल बी ला आयातीला परवानगी भेटली आहे. तसेच कापसावर निर्यातबंदी असल्यामुळे कापसाचा भाव कमी झाला आहे. दिवाळीआधी कापसाला 9000 पर्यंतचा भाव मिळत होता. आता तोच भाव साडेसात हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे._अतुल तनपुरे, कापूस व्यापारी, राहुरी
आतापर्यंत कपाशी या पिकाला पहिल्यांदाच उच्चतम भाव भेटला आहे. याच अपेक्षेने दिवाळीनंतरही चांगला भाव भेटेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता तो घरामध्ये साठवून ठेवला होता. परंतु, दिवाळीनंतर कापसाचे भाव कमी होत गेल्याने शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडल्याने अपेक्षाहीन झाला आहे._मधुकर म्हसे, शेतकरी, कोंढवड
0 टिप्पण्या