राहुरी विद्यापीठ : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे काम चांगले आहे. राहुरी कृषि विद्यापीठाचे काम हे दीपस्तंभासारखे आहे. अजूनही आपल्याला खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. शेतीच्या कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषि विभागांतर्गत आपण 50 हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकर्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कृषि परिषदेच्या महासंचालीका श्रीमती वर्षा लढ्ढा-उंटवाल, पुणे येथील विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उपस्थित होते.
कृषि मंत्री मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेतकर्यांना जास्तीत जास्त सवलती कश्या देता येतील यावर आम्ही भर देत आहोत. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटरीचे बिल आपण माफ केलेले आहे. यासाठी शासनाने 31 हजार कोटी रुपये निधी दिला आहे. कृषिच्या योजना व कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान हे शेवटच्या शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी कृषिमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण सुरू केलेला आहे. शेतकर्यांच्या व्यथा आम्हाला माहित आहे. पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकर्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल यावर आम्ही भर देत आहोत. कै. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काम करणारे नेते होते. शब्दाला जागणारे नेते होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही शेतकर्यांसाठी काम करत आहोत. विद्यार्थ्यांना उद्देशुन ते म्हणाले की विद्यार्थ्यांकडून त्यांच्या घरच्यांच्या फार अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. भरपूर कष्ट करावे व आपले आयुष्य घडवावे. आयुष्य फार सुंदर आहे या सकारात्मक विचाराने आपली प्रगती होईल. कृषी पदवीधरांमध्ये फार एकी आहे. हे कृषी पदवीधर त्यांच्या मित्रांच्या सुखदुःखांमध्ये कायम सहभागी असतात. कृषी पदवीधरांसारखी एकी मी कोणत्याच शाखेमध्ये बघितलेली नाही. मी स्वतः सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असून शेतीची कामे करत लहानाचा मोठा झालो. आज अनेक व्यवसाय असले तरी शेतीसारखा आनंद इतर कोणत्याही व्यवसायात नाही.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे म्हणाले विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवून करणार आहोत. शेतीवर परिणाम करणार्या हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन सुरु करणार आहोत. फुले कृषि महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांवर आयोजीत पीक प्रात्यक्षिकांना शेतकर्यांनी भेटी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषि मंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन देखील कृषि मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स, महाबीज आणि कृषि विभागाचे स्टॉल्सला मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रदर्शनाच्या दरम्यान कृषि मंत्र्यांनी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी भाजीपाला प्रकल्पाच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना भेट दिली. उमेद अभियान अंतर्गत बचतगटांच्या स्टॉल्सला शेतकरी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीपाला सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व ज्वारी सुधार प्रकल्प येथील थेट पीक प्रात्यक्षिकांना शेतकर्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. प्रशांत बोडके यांनी मानले. याप्रसंगी कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, सुरसिंग पवार, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सागर गायकवाड, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे तसेच यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), प्राध्यापक, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी व 6 हजारपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.



0 टिप्पण्या