पेन्शनवाढ निर्णय न झाल्याने ईपीएस-९५ पेन्शनधारक आक्रमक; ९ ते ११ मार्चला दिल्लीत भव्य आंदोलन


श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पेन्शनवाढीचा निर्णय अद्यापही प्रलंबित असल्याने ईपीएस-९५ पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, येत्या ९ ते ११ मार्च रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशव्यापी भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. याच्या तयारीचा भाग म्हणून नुकताच बाभळेश्वर येथे पेन्शनधारकांचा मोठा मेळावा उत्साहात पार पडला.

श्रीरामपूर दूध संघ, बाभळेश्वर यांच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यास मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. यावेळी राहता प्रमुख दशरथ पवार, संगमनेरचे अशोक देशमुख, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष आशाताई शिंदे, राष्ट्रीय संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संपत समिंदर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनवाढीसाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. अनेक आंदोलने, बैठका, खासदारांकडे पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडून केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.”

या पार्श्वभूमीवर आता ‘करो या मरो’च्या निर्धाराने दिल्लीतील जंतर-मंतरवर भव्य आंदोलन छेडले जाणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी त्यात सहभागी व्हावे, तसेच रेल्वे आरक्षण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन पोखरकर यांनी केले.

या मेळाव्याचे आयोजन नानासाहेब खर्डे, गोकुळ चिंतामणी, भाने, जगताप यांनी केले होते. कार्यक्रमास शिवाजी शितोळे, राठोड, इनामदार, कडू, लक्ष्मण हासे, अर्जुन जाधव, सुरेश कटारिया, रायभान तुपे, बी. आर. चेडे, केशव वर्पे आदींसह पेन्शनधारक उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक चिंतामणी यांनी केले तर आभार प्रदर्शन जगताप यांनी मानले.

पेन्शनवाढीच्या मागणीसाठी आता पेन्शनधारकांचा लढा निर्णायक वळणावर पोहोचला असून, दिल्लीतील आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या