मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचा रोजगार निर्माण करावा – जाधव


श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : सध्याच्या काळात पारंपरिक नोकऱ्यांच्या संधी कमी होत चालल्या असून, युवकांनी उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यास स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केले. फिजिओथेरपी, नर्सिंग, एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बौद्ध विहार विकास समिती अंतर्गत हरेगाव बौद्ध विहार विकास समिती (ट्रस्ट) यांच्या वतीने दि. १६ डिसेंबर रोजी आयोजित महार वतन परिषद – स्मृती उजाळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. हरेगाव बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली असून, समाजातील मुलांना उच्च शिक्षित करून नावलौकिक मिळवणे ही काळाची गरज आहे, असेही जाधव यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर धम्मदेसना, मनोगत व खिरदान कार्यक्रम पार पडले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकार गोविंदराव वैजापूरकर, शिक्षक ज्योती दिवे, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब चेडे, डी. एस. गायकवाड व पत्रकार फिलीप पंडित यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच बुद्ध विहार बांधकाम, धम्मकार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीत योगदान दिलेल्या दिवंगत कार्यकर्त्यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बाबुराव सूर्यवंशी यांच्या पत्नी रेखा सूर्यवंशी, प्रकाश दांडगे यांच्या पत्नी सुशीला दांडगे व अलका खरात यांना गौरविण्यात आले. दिवंगत कौशल्या वाहूळ यांचे पुत्र रवी तसेच राहीबाई तात्याबा हिवाळे यांना माता रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रा. बाळासाहेब सातुरे, अशोकराव जाधव, पी. एस. निकम, अ‍ॅड. रावसाहेब मोहन, सी. ए. धीवर, बी. जी. पारधे, उपाध्यक्ष रविंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष बबनराव जाधव, सहसचिव भाऊसाहेब लिहिणार, माजी सरपंच दिलीपराव त्रिभुवन, दादासाहेब खरात, भास्करराव लिहिणार, संजय वाघमारे, राजेश आव्हाड, सुरेंद्र हिवाळे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत खरात, आकाश सूर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय खरात, अमोल जाधव, रवी गायकवाड, अशोकराव हिवराळे, सिद्धार्थ धनेधर, विजय उबाळे, रघुनाथ वाहूळ, पुष्पां गायकवाड व पंचशीला श्रीखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. रघुनाथ वाहूळ यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत खरात यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या