आवाज एका छळलेल्या अबलेचा - मनिषा लांबे

आजकालची आधुनिक स्री कुणावर अवलंबून नाही असे सगळ्यांना वाटते खरच का हे, कितपत सत्य आहे ? सामाजाने तिला अशी चौकट निर्माण केली आहे की ती आयुष्यभर त्या चौकटीमधून बाहेर पडत नाही.

गेल्या आठवड्यात घडलेल्या घटना अगदी मनाचा थरार निर्माण करणाऱ्या आहेत. श्रीरामपूरमध्ये एका महिलेची आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्त्या तिचाच नवरा करतोय. समाजमाध्यमांव्दारे फोटो पाठवतोय, व्हिडिओ कॉल करून सांगतोय, तिच्या भावाला दाखवतोय. ज्या पुरुषावर विश्वास ठेवून आपण आपल्या घरातील मुलगी देतो तो असा वागतोय म्हणजे भयंकरच..!!!

अशी लोकं मानवजातीला कलंक आहेत. ज्या कुटूंबात अथवा घरात ती स्वतःला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचारला बळी पडते. यात आई-वडिलांची पण चूक आहे त्यांना माहीत असत आपल्या मुलीवर कसे अत्याचार होतात तरी ते आपल्या इज्जतीखातर तिला सासरी पाठवतात. आपल्या मुलीच्या जीवपेक्षा लोक काय म्हणतील ? हे त्यांना महत्वाचे वाटते.

बंगालमध्ये एका नाबालिक मुलीवर बलात्कार झाला आणि राजकारणी लोक याविषयी राजकारण करतात हे कितपत योग्य आहे? राजकारण करावे पण एखाद्या गरीबाच्या स्वभिमानाचा बळी देऊन यापेक्षा भयंकर ते काय, स्री ही उपभोगाची वस्तू नाही, तसेच ती कुणाच्या मालकीची वस्तू नाही, तिच्या शरीरावर तिचा हक्क आहे, तिच्या संमतीशिवाय तिला कुणीही हात लावता कामा नये. आजही स्रीयांना अन्याय, अत्याचारास सामोरे जावे लागत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्री मातेसमान मानली. स्रीवरती अत्याचार झाला तर त्याला कडक शिक्षा सुनावली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्रीच्या हातामध्ये शिक्षणाचं शस्र दिलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्रीला योग्य तो अधिकार मिळवून दिला. थोडक्यात असे म्हणता येईल, जमिनीत बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवले त्याला पाणी ज्योतिबा फुले यांनी घातले आणि ते वाढवले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विवाह हा एक असा धागा आहे की, तो समाजास आणि कुटुंबास जोडून ठेवतो. कधी कधी चुकीचा विवाह तिच्या जीवावरती बेततो. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, अपमानास्पद बोलले जाते एवढंच नव्हे तर तिचा जीवही गमवावा लागतो. घरात बायको असताना बाहेर संबंध ठेवतात त्यानंतर त्या स्रीला त्रास देतात. अस करायचं असेल तर विवाहचं करू नये. लहान वयात लग्न करून दिल्याने त्यांना कायदेशीर हक्काची माहिती नसते. आपणही अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देऊ शकतो हेच त्यांना माहीत नसते. ज्यांना माहीत असते त्यांना समाज आडवा येतो आणि आयुष्यभर त्या छळाला सामोरे जातात. कलम ४९८(अ) जर पतीने अथवा त्याच्या नातेवाईकांने पत्नीचा छळ केला अथवा तिला क्रूरपणे वागवले तर त्या व्यक्तीला शिक्षा होते.

महिलांचे काही कायदे माझ्या माहितीप्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत :-
हुंडा प्रतिबंधक कायदा,
महिला संरक्षण कायदा,
बालविवाह प्रतिबंधक कायदा,
कौटुंबिक न्यायालय कायदा,
छेडछाड करणे गुन्हा आहे,
मुलांवर हक्क,
समान वेतन कायदा,
लैगिक गुन्हे,
हिंदू उत्तराधिकार,
हिंदू विवाह कायदा,
प्रसूती सुविधा कायदा,
विशेष विवाह अधिनियम,
गर्भलिंग चाचणी...

कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदे पुस्तकात किंवा न्यायालायापूरतेच मर्यादित राहता कामा नयेत. सर्व सामान्य स्रीयांनाही त्याच्या कायदेशीर हक्काची जाणीव करून द्यायला हवी.

१९६१ च्या कायद्यानुसार हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हा आहे. बऱ्यापैकी लोकांना माहीत असूनही ते हुंडा देतात आणि कुठंतरी तिथून अत्त्याचाराला सुरवात होते लग्नानंतर तिला आणखी पैसे आण म्हणून तिचा अनन्वित छळ केला जातो.
आई-वडिलांच्या पैशावर जगण्याची बांडगुळी वृत्ती नव्या पिढीत येणे हे समाजाच्या दृष्टीने नक्कीच घातकच आहे. आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वाभिमानाने जगायला शिकवणे हे हुंडा देण्यापेक्षा कधीही योग्यच.

स्रीला अपमानित करणारा, तिच्या इच्छाविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध ठेवणारा, सगळ्यात घृणास्पद गुन्हा म्हणजे बलात्कार. स्रीवरती छेडछाड केली किंवा बलात्कार केला तर त्याची तक्रारसुद्धा घरचे नोंदवत नाही कारण त्यांना त्यांच्या मुलीपेक्षा समाज महत्वाचा वाटतो. असेही म्हणता येईल की, घराण्याच्या प्रतिष्ठा या नावाखाली बलात्काराचा गुन्हा ते दडपवून टाकतात. 
बलात्कार असा एक गुन्हा आहे की, ज्यात अपराधी उजळपणाने समाजात वावरू शकतो आणि बळी गेलेली स्री मात्र अपराध्यासारख तोंड लपवते.

बलात्कार करण्याचा प्रयत्नही अपराध आहे जर एखाद्या स्रीने आपल्या स्व संरक्षणासाठी पुरुषाचा खुनही केला तरी तिला शिक्षा होऊ शकत नाही. मुलीचे प्रबोधन करणे, आत्मविश्वास देणे लैगिक शिक्षण देणे आणि स्वसंरक्षण शिकवणे हे बलात्कार टाळण्यासाठी उपाय असले तरी तेवढ्याने भागणार नाही. पुरुषांशी विशेषतः १४ ते १८ वयोगटातील मुलांशी प्रभावी संवाद आणि प्रबोधन हाच यावर उपाय. कुटूंबनियोजन साधनांचा शोध हे आधुनिक स्रीला मिळालेले वरदानच आहे. त्याचबरोबर नको असलेली संतती टाळण्यासाठी आपल्या देशात १९७१ साली एक महत्वाचा कायदा केला गेला तो म्हणजे गर्भपाताचा कायदा. जगामधील अनेक देशातील स्रीया आजही गर्भपाताच्या हक्कासाठी लढत असल्याने आपल्याकडील कायद्याचे महत्व लक्षात येईल. समाजात पीडित स्रीला मानाचे स्थान दिले जावे यासाठी समाजप्रबोधन, जनजागृतीची, सहकार्याची अपेक्षा मी समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून करते. जसा गुन्हा असेल तशी शिक्षा झालीच पाहिजे
हिच यानिमित्ताने अपेक्षा... ( संपादन - बाळकृष्ण भोसले )
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या