श्रीरामपूर : तृतीयपंथी मतदारांना स्मार्ट मतदार ओळखपत्र वाटप करताना नायब तहसीलदार अर्जुन सानप, प्रसन्ना बिंगी,विलास थोरात, प्रकाश माने, शकील बागवान, संदिप पाळंदे, शिवाजी गायकवाड आणि तृतीयपंथी बांधव.
अहमदनगर/ जावेद शेख : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 220 श्रीरामपूर विधानसभा (अ. जा) मतदारसंघ अंतर्गत श्रीरामपूर शहरात तालुका निवडणूक शाखेच्या वतीने तृतीयपंथी सेवा संस्थेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांत २७ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत, तर उर्वरित महाराष्ट्रात २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार अर्जुन सानप यांनी नव तृतीयपंथी मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले. श्रीरामपूर तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून तृतीयपंथी बांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सानप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी निवडणुक शाखेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच अनेक तृतीयपंथी भगिनी या पदवीधर असून पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणी करून घ्यावी अशी विनंती केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तृतीयपंथी मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी स्नेहालय संस्थेचे ॲड. प्रसन्ना बिंगी, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. विलास थोरात, तृतीयपंथी सेवा संस्थेच्या अध्यक्षा पिंकी गुरू, राशी गुरू, सचिव दिशा पिंकी शेख, निवडणूक मित्र प्रकाश माने, स्वीप कक्षाचे संचाकल शकील बागवान, निवडणूक शाखेचे शिवाजी गायकवाड, संदिप पाळंदे यांसह आदी तृतीयपंथी भगिनी व नागरिक उपस्थित होते. शकील बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दिशा पिंकी शेख यांनी मानले.
0 टिप्पण्या