राहुरी / बाळकृष्ण भोसले - अहमदनगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रबोधन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील राम गोसावी यांच्या ' आठवणींचा डोह ' ह्या आत्मपर ग्रंथास हा पुरस्कार घोषित करण्यात आला. राष्ट्र सह्याद्री मध्ये माझ्या मनातल या लेखमाला द्वारे सुनील गोसावी यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला होता. तब्बल साडेतीन महिने चाललेल्या याच लेखमालेचे आठवणींचा डोह हे पुस्तकं नुकतेच पदमश्री पोपटराव पवार, आमदार लहू कानडे, कॉ भालचंद्र कांगो, प्रा डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, ग्रंथ परीक्षक डॉ. शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, उपाध्यक्ष संगीता फासाटे, प्रा. शिवाजीराव बारगळ आदिंच्या उपस्थितीत हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. लवकरच सदर पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या