राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राज्यातील आदिवासी समाजातील गरजू लाभार्थी नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय लाभ देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जात असून यापुढेही अधिक योजना राबवून आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काचे अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
शुक्रवारी राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आदिवासी गरजू नागरिकांना खावटी योजनेचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्राह्मणी सेवा संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र बानकर, राम तोडमल, बाबासाहेब सोनवणे, माजी नगरसेवक शहाजी ठाकूर, सुनील मोरे, विजय तमनर आदी उपस्थित होते. मंत्री तनपुरे म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी आदिवासी समाज विखुरलेला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भागात मोठी संख्या आहे. शासनाने या समाजासाठी विविध योजना आणलेल्या आहेत. नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून आदिवासी नागरिकांना त्यांचा हक्क मिळून दिला जात आहे. राहुरीतील दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे. या टप्प्यात सुमारे ६०० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. २ हजार रुपये रोख व किराणा किटचा त्यात समावेश आहे. आदिवासी विकास खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी कायम कार्यरत असतो. आदिवासी खात्यातील अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षम होऊन समाजाला कोणत्याही परिस्थितीत वंचित न ठेवता शासकीय योजना थेट त्यांच्या घरापर्यंत देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी किरणकुमार काकडे, राहुरी तालुका खावटी समन्वयक प्रमोद भिंगारदिवे, सी एन जाधव, कुक्कडवेढेचे माजी सरपंच जगन्नाथ चौधरी, नंदकुमार गागरे व आदिवासी समाजातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास ६०० नागरिकांना याचा आज लाभ मिळाला. यापूर्वीही पारधी समाजातील नागरिकांना पन्हाळी पत्र्याचे व किटचे वाटप करण्यात आले होते.
0 टिप्पण्या