वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण समोर उपोषण - पवार

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील केसापूर येथे सिंगल फेज विद्युत पुरवठा बेलापूर फिटरमधुन होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी रात्रीला तर कधी दिवसा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. दिवसा कडक उन व रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून जीव मेटाकुटीला येत आहे. लहान मुले, वृद्ध, महिला, पुरुष यांची उष्णतेमुळे घबराट होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बेलापूर येथील महावितरण कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषण करण्यात येईल असा कडक इशारा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, माजी सरपंच दिपक पवार यांनी दिला आहे.

उपोषणाचे निवेदन उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष नाईक यांना पवार यांनी पाठवले आहे. आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची राहील अशी माहिती दिपक पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या