कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सार्थक सदैव अग्रेसर- उमेश तांबडे

अहमदनगर/ जावेद शेख : कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या लहान मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सार्थक संस्था सदैव अग्रेसर राहील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अभियंता उमेश तांबडे यांनी केले. ज्ञानसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्थक बहुद्देशीय संस्था व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने अशोकनगर सहकारी साखर कारखाना परिसरातील साखर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटण्यात आले, त्याप्रसंगी तांबडे बोलत होते.

यावेळी उमेश तांबडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी संविधान दिले त्याच संविधानाने सर्वांना समान न्याय दिला. जगण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच सर्वांना शिक्षणाची द्वारे खुली झालेली आहेत. मात्र रोजीरोटीसाठी भटकंती कराव्या लागणार्‍या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जावू नये म्हणून राज्यात प्रत्येक साखर कारखाना अशा विद्यार्थ्यांसाठी साखर शाळा चालवते. अशाच गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरतपाने चालू राहणे आवश्यक आहे. शासनाने महात्मा फुले शिक्षण हमी योजना पुन्हा नव्याने सुरू करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उद्योजकांच्या माध्यमातून सर्व सोयी उपलब्ध करून देण्यास सार्थक संस्था सदैव अग्रेसर राहील. येत्या शैक्षणिक वर्षात मॉडेल साखर शाळा प्रकल्प राबवू असेही तांबडे म्हणाले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव शकील बागवान, समन्वयक शिरीष सूर्यवंशी, साखर शाळेचे पर्यवेक्षक समीर पठाण, सहाय्यक शिक्षक दत्तात्रय मुळे, किशोर उंडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्तात्रय मुळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या