राहुरी / बाळकृष्ण भोसले - तांभेरे गावातील दोन समाजात जो वाद सुरू आहे. त्यात तहसीलदार शेख व पोलीस निरीक्षक दराडे यांनी स्वत: लक्ष घालून या वादावर पडदा पाडून दोन्ही समाजाला न्याय मिळेल असा निर्णय द्यावा अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केली असून काही मंडळी यात राजकारण करत असून समाजाच्या नावाखाली राजकारण करण्याचे उद्योग बंद करावेत असेही पगारे यांनी म्हंटले आहे.

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे परंपरेनुसार असलेल्या भीमा स्तंभावर निळा झेंडा लावण्याचा कारणावरून गेल्या काही दिवसांपासून दोन समाजात वादावादी सुरू असून गावबंद, मोर्चे अशा प्रकाराने प्रकरणाला वेगळे वळण लागत असल्याचे आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हंटले आहे. तांभेरे येथील वाद मिटविण्यासाठी तहसीलदार एफ. आर. शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गावात बैठक घेऊन दोन्ही समाजातील प्रतिनिधिंना योग्य ती समज देऊन दोन्ही समाजास समान न्याय भेटेल असा निर्णय द्यावा. त्यामुळे जातीय दंगल अथवा कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही.

हम सब एक है याप्रमाणे गावात सर्वांनी एकदिलाने राहून जातीभेद नष्ट व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. काही मंडळी या प्रकरणात समाजाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. टाकळीमिया, तांभेरे येथील जातीय मतभेदांमुळे राहुरी तालुक्याचे नाव राज्यात खराब होत आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यात अन्य गावांत होऊ नये व जातीय तेढ निर्माण होईल अशी स्थिती उदभवू नये म्हणून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी तातडीने लक्ष घालावे व यातून मार्ग काढावा अशी मागणी भाऊसाहेब पगारे यांनी केली असून नगर जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहावी या हेतूने आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीत जातीय सलोखा परिषद आयोजित करण्यात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पगारे यांनी सांगितले.