'शब्दगंध' च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन

राहुरी / बाळकृष्ण भोसले - “१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह, कादंबरी, बालवाड्मय, संशोधन ग्रंथ, समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.

पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक, कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ मार्च २०२२ पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, किशोर डोंगरे, प्रा.अशोक कानडे, शर्मिला गोसावी, सुनील गोसावी, राजेंद्र फंड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या