अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर येथील सय्यदबाबा दर्गाह समोरील रेल्वे भुयारी मार्गाच्या छताची नुकतेच एक्टेंशन व नुतनीकरणाची कामे झाली असली तरी पुलाखाली मात्र प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झालेली आहेत. त्यात याठिकाणी दर्गाह बाजुने असलेल्या भुयारी मार्गालगत अंडरग्राऊंड जनरल गाव गटार आहे.
या भुयारी मार्गातील पावसाचे पाणी जाण्याकरीता सदरील गटारीवर चेंबर देखील बनविण्यात आलेले आहे. मात्र परिस्थिती या ठिकाणी त्याविरुद्ध आहे, त्या चेंबरमध्ये पावसाचे पाणी जाणे तर सोडाच याउलट त्या चेंबरमधून गटारीचे घाण पाणी भुयारी मार्गात येत आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे मोठे दुरापास्त होत असुन संभव्य अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय जवळच असलेल्या हजरत सय्यदशाह कादरी बाबा दर्गाह आणि जामा मस्जिद असल्याने भाविक भक्त आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुढे ३ एप्रिलपासून मुस्लिम धर्मियांचा उपवासाचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. याठिकाणी आणखी वर्दळ वाढली जाणार आहे करीता मुख्याधिकारी श्रीरामपूर नगर परिषद यांनी तात्काळ जातीने लक्ष घालुन या त्रासापासून नागरीकांची सुटका करावी अशी मागणीही युवक काँग्रेसचे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष जाफरभाई शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
0 टिप्पण्या