राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संस्थापक व तालुक्यातील सहकाराचे महर्षी डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांचे वारस तथा राज्यातील सरकारचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच विद्यापीठाच्या ५४ व्या स्थापना दिन कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आल्याने तालुक्यातील जनतेतून विद्यापीठ प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त होत आहे.
डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांनी विकासाची दुरदृष्टी ठेवून शेतकरी व कामगारांच्या भविष्यासाठी राहुरीत विद्यापीठ असावे म्हणून तत्कालीन सरकारकडे आग्रह धरला व विद्यापीठाची स्थापना केली. बरोबरच शेतीसिंचनाचा भविष्यकालीन वेध डोळ्यासमोर ठेवून मुळा धरणाची निर्मिती केली तर तालुका ऊसाचे आगार म्हणून संबोधला जायचा या ऊसाचे गाळप तालुक्यातच होवून जास्तीचे दोन रुपये शेतकऱ्यांना मिळावे या उद्देशाने सहकार तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली. शेतकरी, कामगार, महिला, मजूर, छोटेमोठे कारागीर व उद्योग व्यवसायातून तालुका प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तालुक्यातील सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याची यथोचित फळे आजच्या पिढीला मिळत आहेत.
विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून डॉ. तनपुरेंची ओळख आजही जून्या पिढीतील अनेकजण गौरवाने सांगतात. मात्र त्याच विकासगंगेच्या स्थापना दिन कार्यक्रमात डॉ. तनपुरेंचे तिसऱ्या पिढीतील वारसदार राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा विसर विद्यापीठ प्रशासनाला पडला असल्याचे वास्तव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून समोर आले आहे. याआधीही राहुरी कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला त्या वेळी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही मंत्री तनपुरे यांना स्थान देण्यात आले नव्हते.
0 टिप्पण्या