राष्ट्रीय स्तरावरील तीन आठवड्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम संपन्न
राहुरी विद्यापीठ : भारतात शाश्वत शेतीसाठी तसेच भरघोस उत्पादन वाढीसाठी जमीन वापर नियोजन अत्यंत आवश्यक आहे. योग्य जमीन वापर नियोजनासाठी मातीची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये डिजीटल मृद् विज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या नवीन प्रणालींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज आहे. यामुळे नवीन पिढीला मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा वापर शाश्वत पद्धतीने करण्यास मदत होईल असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान अद्यावत शेतीसाठी शाश्वत जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावरील तीन आठवड्याचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेशकुमार चौधरी बोलत होते. याप्रसंगी नवी दिल्ली जीआयझेड, प्रो-सॉईलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष, नवी दिल्ली येथील प्रो-सॉईल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व कृषी अभियांत्रिकी आणि प्रकल्प, जीआयझेडचे संचालक डॉ. राजीव अहल, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, भारतातील विविध संस्थांमधील मृदाशास्त्रज्ञ, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि या प्रशिक्षणाचे निमंत्रक व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी रसायन व मृदा शास्त्र विभाग प्रमुख व प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहनिमंत्रक डॉ. मुकूंद शिंदे व सह आयोजक डॉ. अनिल दुरगुडे उपस्थित होते.
डॉ. इंद्रनील घोष यांनी विद्यापीठ आणि जीआयझेड सारख्या संस्थांनी विद्यार्थी व शेतकर्यांच्या कल्याणासाठी एकत्र येवून काम करावे असे मत व्यक्त केले. या तीन आठवड्याच्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी कृषी मृदा व रसायनशास्त्र व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रातील व राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर आणि विविध प्रादेशिक केंद्रांतील वेगवेगळे नामवंत प्रशिक्षक लाभले होते. डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रो-सॉईल, जीआयझेड, पुणेचे तांत्रिक सल्लागार इंजी. रणजीत जाधव यांनी आभार मानले. या ऑनलाईन प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. निलम कोंडविलकर, डॉ. अंजली मुसमाडे आणि इ. मोसीन तांबोळी यांनी काम पहिले. या प्रशिक्षणाला संपूर्ण भारतातून 31 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या