बालानगरचे आरोग्य केंद्र रामभरोसे; डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची दांडी


बालानगर/अफसर शेख : कोरोनाच्या महामारीत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र अलर्ट राहणे आवश्यक आहे. तसे आदेश वरीष्ठांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत पैठण तालुक्यातील बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जर अशावेळी एखादा गंभीर रुग्ण आला तर त्याच्यावर उपचार कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर हजर रहात नसल्याने या भागातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शासनाने गरीब गरजुं, सर्वसामान्यांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावे, यासाठी ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारले. मात्र बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या सुविधेचा पुरता बोजवारा उडाला असून डाॅक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. या केंद्राची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. बालानगरसह परीसरातील अनेक गावांचा भार असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या रामभरोसे सुरू आहे. दोन वैद्यकीय अधिकारी व बारा कर्मचारी असलेल्या या केंद्रात कुणीच हजर नसल्याची बाब नुकतीच येथील काही नागरीकांनी दिलेल्या भेटीवरून समोर आली आहे. हजर नसने, वेळेवर न येणे, लवकर निघून जाणे, केंद्रातील हजेरी रजिस्टरवर वेळ मिळेल तेव्हा स्वाक्षऱ्या करने. असे प्रकार सतत घडत आहेत. या आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकराचे नियंत्रण नसल्याचे सिद्ध झाले आहे.

मी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास बालानगर येथील आरोग्य केंद्रात गेलो असता फक्त दोन कर्मचारी होते. ते पण बाहेर जाणार होते. तेथे वीस ते पंचवीस लसीकरणासाठी व काही आजारी रुग्ण ताटकळत बसले होते.  

   -मच्छिंद्र गल्हाटे, उपसरपंच बालानगर

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली... 

काही दिवसापूर्वी बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन तास मिटिंग घेऊन जिल्हाधिकारी यांनी रुग्णांना तत्पर सेवा देण्यात यावी. हलगर्जीपणा चालणार नाही. हजेरी बायोमेट्रिक बसविणे असे आदेश दिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची देखील पायमल्ली होताना दिसत आहे. एवढेच नाही तर मुख्यालयी रहाण्याचे शासनाचे आदेश असताना देखील एकही डाॅक्टर व कर्मचारी येथे निवास करत नाहीत विशेष. येथील निवासस्थाने ही केवळ शोभेची वस्तू बनली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या