अहमदनगर/ जावेद शेख : भारत निवडणूक आयोगामार्फत शंभर टक्के मतदार यादी फोटोसह अपडेट करण्यात आलेली आहे. ज्यांची नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट करावयाची असतील तसेच मतदार यादी मध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करावयाच्या असतील त्यांनी निवडणूक आयोगाचे ॲप व वेबसाईट वर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे अशा सर्वांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून घेणे गरजेचे आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव या महाविद्यालयात आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ऑनलाइन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी अनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता व जनजागृती याविषयी मार्गदर्शन केले. प्रामाणिक व चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास निर्णयक्षम सरकार अस्तित्वात येऊन समाजाच्या दृष्टीने चांगले निर्णय झाल्यास फायद्याचे होईल. त्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाच्या ॲपचा व वेबसाईटचा वापर करून सर्वांनी स्वतःची व आपल्या मित्र व नातेवाईकांना निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद रसाळ यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाला डॉ. रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमाबद्दल डॉ. रसाळ यांनी आयोजकांचे कौतुक केले. लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी 50.48 व विधानसभेची टक्केवारी 59% असून की टक्केवारी 65% करण्यासाठी तरुण पिढीने मतदान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
साखर कारखानदारी क्षेत्र आहे तेथे ऊस तोड कामगारांचे तसेच सोलापूर सारख्या ठिकाणी बिडी कामगार व तृतीयपंथी अशा लोकांना मतदान करणे शक्य होत नाही. अशा लोकांना मतदानाला संधी मिळाल्यास निवडणुकीची टक्केवारी वाढू शकते. औद्योगिक क्रांती घडून आणण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून जाणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद अहिरे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःची नोंद मतदार यादी मध्ये करून घेऊन आपल्या इतर सहकार्यांना सुद्धा मतदान करण्यास भाग पाडावे. जेणेकरून मतदानाची टक्केवारीत वाढ होईल. जवळपास ३५% मतदार मतदानात भाग घेत नाहीत. त्यामुळे शिक्षित व प्रामाणिक प्रतिनिधी निवडून जात नाहीत असे प्रतिपादन डॉ. अहिरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी डॉ. मनोज गुड यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. प्रेरणा भोसले, प्रा. कीर्ती भांगरे, सौ.अंजली देशपांडे, सौ वैशाली पोंदे, सौ ज्योती सासवडे, अमृत सोनवणे व अनिल शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे आभार निवडणूक साक्षरता मंडळाची प्रतिनिधी कुमारी प्रज्ञा घुले यांनी मानले.
0 टिप्पण्या