राहुरी शहर /अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्याला वरदान असलेल्या मुळा धरणाच्या सुरक्षेचा पश्न निर्माण झाला असून याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे यांनी शासन दरबारी कैफियत मांडली आहे.
यासंदर्भात श्री गाडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळा धरणाकडे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याने उपअभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी मनमानी पणे कामे केली आहेत. मुळा धरणावर पथदिवे बसवलेे. त्यातील ६०% दिवे बंद आहेत तर काही खांबांवर घरगुती बल्ब बसवण्यात आलेले आहेत.
धरणावर २२ सिसी कॅमेरे बसवले आहेत. मात्र, आज रोजी एकही कॅमेरा चालू नाही. धरणाच्या संरक्षण कठड्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तर श्री आंधळे यांनी भंगार साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा सपटा लावला आहे. धरणावर काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांचे भवितव्य धोक्यात आहे. गेल्या १० महिन्यां पासुन मजुरांना पगार नाहीत, त्यांचे मस्टर नाही. वेतन चिठ्या नाहीत हे मजुर कामावर असल्याच्या कोणत्याही लिखीत नोंदी नाहीत. कोणत्याही प्रकारचे पिएफ अथवा विमा कवच नाहीत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही श्री गाडे यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या