मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याच्या लढ्यातील रोकडे माईंचा सत्कार


राहुरी शहर/अशोक मंडलिक
: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तार दिनानिमित्ताने नामांतर लढ्यातील नगर जिल्ह्यातील एकमेव महिला भिमसैनिक म्हणून ज्यांची नोंद आहे अशा राहुरीच्या शिलादेवी दादासाहेब रोकडे माई यांची नामविस्तार दिनी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनी राहत्या घरी भेट देत नामांतर लढ्याला उजाळा देवून माईंना संविधान प्रास्ताविका, शाल, पुष्पगुच्छ देत सन्मानित करुन दर्शन घेत लढ्यातील शहिदांना अभिवादन केले.

औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी झालेल्या नामांतर चळवळीच्या लढा अखेर १४ जानेवारी १९९४ ला यशस्वी झाला खरा परंतु नामांतर न होता नामविस्तार झाला. नामांतराचा लढा १९७८ साली सुरु झालेला असताना तत्कालीन सरकारने वेळीच नामांतर केले असते तर अनेक संसार बेचिराख होण्यापासून वाचले असते. कारण या संघर्षमय लढ्यासाठी आंबेडकर अनुयायांनी आपल्या प्राणाची आहूती दिली काहींना तर जिवंत जाळण्यात आले. दंगली उसळल्या संसार उद्धवस्त झाले तरी देखील आंबेडकरी समाज मागे हटला नाही. कारण जन्माला येतानाच पोटी संघर्ष घेवून येणारा समाज नामांतरासाठी लढा देत राहीला. यात पुरुषांच्या खांद्याला हात देत स्त्रिया देखील पुढे होत्या.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस संघर्ष तिव्र होत असताना राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील आंदोलक औरंगाबद येथे लढ्यात सहभागी होत असताना नगर जिल्ह्यातील राहुरी येथून धूरंधर रणरागीणी भिमाची लेक शिलादेवी दादासाहेब रोकडे या देखील नगरच्या भिमसैनिकांसह औरंगबादला १९७९ साली सहभागी झाल्या. औरंगाबदच्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांंगणातून निघालेल्या आंदोलकांना क्रांतीचौकात पोलिसांनी अडवले असता भिमाची लेक शिलादेवी रोकडे यांना व त्यांचेसोबत असलेल्या भिमसैनिकांना अटक करण्यात आली व त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली. तब्बल १५ दिवस शिलादेवी व आंदोलकांनी राजकैदी म्हणून तुरुंगवास भोगला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर देखील लढा सुरुच राहीला होता. नगर जिल्हा व राहुरीतून एकमेव महीला आंदोलक म्हणून शिलादेवी यांचे नाव नामांतराच्या लढ्यात लिहीले गेले आहे.

नामांतर लढ्यानंतर नामविस्तार झाला. काल १४ जानेवारी संक्रांती दिनी नामविस्तार वर्धापनदिनी शिलादेवी (माई) दादासाहेब रोकडे यांची राहुरीच्या आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी भेट घेत नामांतर लढ्यास उजाळा देत माईंना संविधान प्रास्तविका शाल पुष्पगुच्छ देवून सन्मान करत धन्यवाद दिले. याप्रसंगी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी लढ्याच्या आठवणी सांगत माईंनी कार्यकर्त्यांना तत्कालीन घटनाक्रम सांगत बाबासाहेबांची शिकवण अंगीकारत समाजासाठी लढत राहावे असा संदेश दिला. माईंच्या तत्कालिन नामांतर लढ्यातील सहभागासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरिष गायकवाड, रिपाइं तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, पत्रकार संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त करत नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करुन नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन केले.

यावेळी पत्रकार शरद पाचारणे,संजय संसारे,राहुरी खूर्दचे पोलिस पाटील इंजी.बबनराव अहिरे, दादू साळवे, सचिन साळवे, माईंचे चिरंजीव प्रा.तथागत रोकडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या