पैठण : कुतुबखेडा-खंडाळा या सजेवर कार्यरत असलेले तलाठी मुख्यालयी न राहण्याच्या कारणामुळे व मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांना नाहक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर तलाठी यांना मुख्यालयी रहाण्याचे आदेशित करावे अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठणचे तहसीलदार यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुतुबखेडा-खंडाळा येथील तलाठ्यांच्या मनमानी कारभारामुळे मुख्यालयी राहत नसल्याने ऑनलाईन सातबाऱ्यातील झालेल्या चुका व कृषी विभागाच्या अनेक योजना लाभासाठी लागणारे कागदपत्रे यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी संपर्क करावा लागत आहे. परंतु तलाठी यांचा भ्रमणध्वनी कधी चालू राहत नाही, यदा कदाचित फोन लागल्यास फोन उचलत नाही अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
अगोदरच राज्यांमध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून, गाव पातळीवर काही उपाययोजना करायची असेल तर त्यासाठी महसूल प्रशासनातील तलाठी महोदयांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर असतानाही तलाठी सुनील मोळवणे हे मुख्यालयी न थांबता औरंगाबाद शहरांमधून कामकाज बघत आहेत. त्यामुळे त्यांचा कधीही थेट संपर्क शेतकऱ्यांशी येत नाही त्यांनी नेमणूक केलेले कोतवाल श्री. लबडे यांचीसुद्धा शेतकऱ्यांसोबत अरेरावी व उद्घटपणाच्या बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झाल्या असून या प्रकरणी तलाठी सुनील मोळवणे यांची खातेनिहाय चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, योगेश जगताप, राकेश वाघे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या