राहुरी : डिग्रस परिसरातील शेतकऱ्यांची ऊस तोड सुरू असल्याने ऊस वाहतुक करणारे वाहने विद्यापीठ हद्दीतून असलेल्या रस्त्यामार्गे वाहतूक करत आहेत.डिग्रस गावाच्या एकीकडे नदी तर दुसरीकडे धरमडी डोंगर असल्याने जड वाहतूक ही धरमडी डोंगर असलेल्या मार्गे करणे शक्य नसल्याने उस वाहतूक विद्यापीठ हद्दीतून असलेल्या रस्त्यामार्गे केली जात आहे.परंतु सदर वाहने ही विद्यापीठ सुरक्षा रक्षकांकडुन अडविले जात असुन वाहन चालकांना परत विद्यापीठ हद्दीतून येवू नये,अशा प्रकारच्या सुचना केल्या जात असल्याने क्रांतीसेनेच्या शिष्टमंडळाने आज विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक अडवु नये,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
" कृषी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले असता विद्यापीठ प्रशासनाचे असे म्हणणे आहे की,सदरील रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित कारखान्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा किंवा ग्रामपंचायत निधीतुन देखभाल दुरुस्ती करावी.परंतु या भागातील उस तोड करणारे अनेक कारखाने असल्याने हा प्रश्न कोण सोडवणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.तसेच विद्यापीठ व डिग्रस ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्र येऊन या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी दिले."
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,डिग्रस व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी आपल्या जमिनी दिल्या तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेले विद्यापीठ आज मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक आडवुन शेतकऱ्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे.यातुन कोणत्या प्रकारचे हित विद्यापीठ साधत आहे,हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.जड वाहतूक करण्यासाठी पर्यायी रस्ता हा विद्यापीठ हद्दीतून जातो तसेच सदर रस्ता हा डिग्रस गावचा शिवरस्ता आहे.विद्यापीठ स्थापन होण्या पूर्वीपासुन शेतकरी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी,हितासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाकडुन अशाप्रकारे शेतमाल वाहतूक अडवुन शेतकऱ्यांची अडवणूक करणे हे योग्य नाही.कृषीप्रधान देशात कृषी विद्यापीठाकडुन शेतकऱ्यांच्या शेतमालाची अडवणूक करणे योग्य नसल्याने शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक करु नये.अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल,असा इशारा क्रांतीसेनेने दिला आहे.यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ देशमुख,अविनाश भिंगारदे,युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर नरसिंगराव पवार,युवक तालुका उपाध्यक्ष पप्पु हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या