कृषी

विद्यापीठ विकसीत डिजीटल तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्वावर प्रसार होणे गरजेचे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत विविध हवामान अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये स्वयंचलीत हवामान केंद्र, आय.ओ.टी. तंत्रज्ञान, आटो.पी.आय. तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता, रोबोटीक्स तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर विकसीत होऊन शेतकर्यापर्यंत पोहचण्यासाठी नविन उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपनी यांची आवश्यकता आहे.

विद्यापीठ हे तंत्रज्ञान देण्यास तयार आहे. परदेशात औद्योगीक क्षेत्राच्या मागणीनुसार संशोधन केले जाते. त्याच धर्तीवर या विद्यापीठात संशोधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भारत सब कॉन्टीनंट ॲग्री फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यामुळे नविन तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर प्रसार होण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा शेतकरी व कृषि क्षेत्रातील उद्योजकांना होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (नाहेप-कास्ट) कार्यरत असून त्या अंतर्गत भारत सब कॉन्टीनंट ॲग्री फाउंडेशन संस्थेबरोबर कृषि क्षेत्रातील आय.ओ.टी. आधारीत तंत्रज्ञानावर एक दिवसाचे बुध्दीमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या बुध्दीमंथन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते.

यावेळी भा.कृ.अ.प.चे उपमहासंचालक (शिक्षण) आणि रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय निदेशक डॉ. आर.सी. अग्रवाल, कास्ट प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, भारत सब कॉन्टीनंट ॲग्री फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेग अग्रवाल, आय.टी. प्रमुख ओंकार द्रवीड, संचालक विजय नरसिंहान, चार्टर्ड अकौंटट कवित कोतदार व कास्ट प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

यावेळी ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करतांना डॉ. आर.सी. अग्रवाल म्हणाले कोणतेही तंत्रज्ञान पायलट मोडवर ठेवणे उपयोगाचे नसुन त्याचे व्यापारी तत्वावर उत्पादन होणे व ते जनसामान्यांपर्यत पोहचणे गरजेचे आहे. येथून पुढे औद्योगीक क्षेत्राला आवश्यक असलेले संशोधन कृषि विद्यापीठात होणे गरजेचे आहे.

याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक विवेक अग्रवाल म्हणाले विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाने आय.टी. आधारीत तंत्रज्ञानावर मोठे संशोधन केलेले आहे. या संशोधनाचे व्यापारीकरण होवून ते शेतकर्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आमची स्वयंसेवी संस्था अशिया खंडाच्या सर्व देशातील कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कंपन्यांना तंत्रज्ञान देवाण-घेवाणसाठी एकत्र करत असते. यावेळी आम्ही महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला त्यांचे संशोधन मांडण्यासाठी संधी देणार आहोत.

विद्यापीठाचे हे आय.ओ.टी. आधारीत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी व्यापारी तत्वावर पुढे नेण्यासाठी आशिया खंडातील विविध कंपन्या उत्सुक आहेत. यावेळी डॉ. अनुराधा अग्रवाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट कासम प्रकल्पात सुरु असलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. यावेळी कास्ट प्रकल्पाचे सर्व अधिकारी, संशोधन सहयोगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button