कृषी

माती व पाण्याचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन करण्याची शपथ घेऊया – अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार

राहुरी विद्यापीठ : माती शिवाय पाणी व पाण्याशिवाय माती याचा विचार आपण करु शकत नाही. जमिनीच्या प्रकारानुसार त्यामधील पाण्याची उपलब्धता ठरत असून आपल्या भागातील जमिनीच्या प्रकाराचा उपयोग करुन घेवून आपल्याला माती व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. उपलब्ध असलेली जमीन व पाणी हे सुरक्षीत राहण्यासाठी व त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी चॅप्टर इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सायन्स, मृदविज्ञान विभागाच्या वतीने जागतीक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार बोलत होते. माती आणि पाणी जीवनाचा स्त्रोत या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राहुरी तालुक्यातील खडांबे येथील प्रगतशील शेतकरी कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, मृद विज्ञान विभागाच्या प्राध्यापीका डॉ. रीतू ठाकरे उपस्थित होते.

यावेळी सुरसिंग पवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपल्या प्रत्येकाची नाळ मातीशी जोडलेली आहे. दिवसेंदिवस जमीन धारणा क्षेत्र कमी होत असतांना रासायनीक खते मोठ्या प्रमाणात वापरुनसुध्दा अपेक्षीत उत्पादन शेतकर्यांना मिळत नाही. अशावेळी सर्वांनी माती परिक्षण करुनच रासायनीक खतांचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आजच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः बरोबर शेजारच्या पाच शेतकर्यांना माती परिक्षण करण्यासाठी उद्युक्त केले तर आजचा मृदा दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भिमराव कांबळे यांनी केले.

मृदशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की माती आणि पाणी हे एकमेकांना पुरक आहेत. माती ही अनमोल असून तीच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनावश्यक व अपायकारक गोष्टींची भेसळ होत आहे. माती रसायनमुक्त कशी करता येईल? मातीमधील कर्बाचे प्रमाण कसे वाढवता येईल? मातीमधील सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढण्यासाठी काय करता येईल अशा प्रकारच्या विविध प्रश्नांवर उपाय योजना कराव्या लागणार आहेत. गावातील गावठाण, पानंद जागा व साठवण तलाव यांची जपणूक जरी केली तरी माती व पाण्याचे संवर्धन हाईल. विविध रासायनीक घटकांचे प्रमाण किती असावे व त्यांच्या अतिवापराने होणारे दुषपरिणामा त्यांनी यावेळी उदाहरणासह सांगितले.

मृदशास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे यावेळी म्हणाले की, शेती व्यवसाय उत्पादनक्षम जमिनीशिवाय होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील सर्व पिकात मातीमधील विविध अनुकुल घटकांच्या कमतरतेमुळे साधारण 40 ते 80 टक्के उत्पादन कमी येत आहे. त्यासाठी मातीचे आरोग्य जपायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निशांत भालेकर व मयुरी हुलगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती पाटील यांनी तर आभार डॉ. शुभांगी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मृदविज्ञान व कृषि विद्या विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button