कृषी

कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे सैनिक – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

राहुरी विद्यापीठ : पूर्वीसारखी शेती राहिलेली नसल्याने शेतीसमोर माती, प्रदुषीत पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर उत्तर शोधण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांंची आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये संशोधन करुन नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकर्यांची केलेली सेवा असून कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. अब्दुल सत्तार यांनी केले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पोकराचे प्रकल्प संचालक डॉ. परिमलसिंग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणुन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर.ए. मराठे, तीनही विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली), डॉ. इंद्र मणी (परभणी), डॉ. शरद गडाख (अकोला), कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे, दत्तात्रय उगले, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. संजय भावे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव प्रमोद लहाळे, कराड कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.

ना. अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी बियाणे निर्मितीमध्ये उच्चांक केलेला असून त्यामुळे शेतकर्यांना बियाण्यांचा पुरवठा करतांना अडचण येणार नाही. कृषी विद्यापीठातील काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे काम हे शत्रू सैन्याबरोबर लढाई करणाऱ्या सैनिकांइतकेच मोठे आहे. सध्या शेतीमध्ये जमीनधारणा क्षेत्र घटत चालल्यामुळे शेतकर्यांना ड्रोन वापरतांना अडचणी येऊ शकतात. यावर शेतकर्यांनी गटशेतीच्या माध्यमातून पर्याय शोधला पाहिजे. विद्यापीठांनीही कमी खर्चामध्ये ड्रोन तयार केल्यास छोट्या शेतकर्यांनाही तो वापरता येईल. त्यामुळे खतांबरोबरच औषध फवारणी केल्यामुळे शेतकर्यांचा आर्थिक फायदा होईल.

कृषी विद्यापीठे परदेशातील विद्यापीठांबरोबर तसेच संस्थांबरोबर करीत असलेल्या सामंजस्य करारांमुळे संपूर्ण देश व परदेशातील विद्यापीठांनाही दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे करीत आहेत. कृषि विद्यापीठे ही पवित्र मंदिरे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांना संशोधनासाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी जॉईंट ॲग्रेस्को-2023 च्या स्मरणीकेचे आणि चारही कृषि विद्यापीठांच्या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी चारही कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानांचे प्रदर्शनाचे मोठे दालन उभे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कृषि मंत्र्यांच्या हस्ते झाले.

यावेळी चारही कृषि विद्यापीठातील चार शास्त्रज्ञांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार कृषि मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ. पवन कुलवाल, अकोला कृषि विद्यापीठातील डॉ. रामेश्वर कुर्हाडे, परभणी कृषि विद्यापीठातील डॉ. दिपक पाटील व दापोली कृषि विद्यापीठाच्या डॉ. भरत वाघमोडे यांचा समावेश होता. यावेळी सेंद्रिय शेती प्रकल्प, जैविक खत प्रकल्प आणि ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कृषि मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनांचे सादरीकरण, मुल्यमापन या बैठकीमध्ये होत असून अशा प्रकारची बैठक देशामध्ये फक्त महाराष्ट्रात होत असल्याचे सांगितले. डॉ. परिमलसिंग यावेळी म्हणाले की कृषि विद्यापीठांनी केलेल्या संशोधनाचा कृती संगम सिध्द होण्यासाठी अशा बैठकांची गरज आहे. यावेळी दापोली विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचा सेवानिवृत्ती निमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी तर आभार डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मानले. 

यावेळी कृषि विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, हवामान विभागाचे अधिकारी, एम.ए.आय.डी.सी.चे अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी, उद्यानविद्या विभागाचे अधिकारी उपस्थत हाते. याप्रसंगी चारही कृषि विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक आणि 450 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तीन दिवसीय बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांच्या संशोधनाला मान्यता देण्यात येईल.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button